मुंबई : मणिपूर प्रकरणावरून देशात सुरु असणाऱ्या गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या सर्व आरोपांवर संसदेत उत्तर दिले. मात्र त्यावर देखील विरोधकांचे समाधान झाले नसल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान देशासाठी धोकादायक असल्याची सडकून टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आंबेडकर यांनी ही टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी,”पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी फेरविचार केला पाहिजे” असे म्हटले आहे. त्यासोबतच मोदींनी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले पाहिजे असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी भाजपाविरोधातल्या ‘इंडिया’ या आघाडीच्या विरोधात वक्तव्य केले. या आघाडीत एसटी, एससी, ओबीसी नाहीत. माझ्यासारखे भाजपाच्या विरोधात असणारे तुम्ही का घेत नाही? असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे. मुंबईत भाजपा विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीचे कुठलही निमंत्रण मला देण्यात आलेले नाही. मुंबईतल्या बैठकीच्या निमंत्रणाची मी वाट पाहतो आहे असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान माझे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्याशी घरगुती संबंध होते, अशोक चव्हाण यांच्याशीही माझे घरगुती संबंध आहेत त्यांच्याशी माझा राजकारणापलिकडचा संवादा आहे असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीत माझा समावेश करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. उद्धव ठाकरे हे शब्दाचे पक्के आहेत. उद्धव ठाकरे हे कमी बोलतात पण ठोस बोलतात असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आम्हाला दंगल थांबवायची होती म्हणून आम्ही तिथे गेलो होतो असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.