भाजप इच्छुकांच्या मुलाखतींमुळे चर्चेला उधाण
– रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – राजकारणात अग्रणी असलेल्या उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड तालुका नेहमीच चर्चेत राहिला आहे. लोकसभा, विधानसभेची निवडणूक असो की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक, यामध्ये खेड तालुक्याकडे जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागून असते. तालुक्यात सर्वच निवडणुका आतापर्यंत मोठ्या चुरशीच्या झाल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणूकही चुरशिचीच होणार असल्याची स्थिती सध्यातरी निर्माण झाली आहे. जशाजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसे राजकीय भूकंप सुरू झाले आहेत. दिलीप मोहिते पाटील यांच्यावर चाकण हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल होताच खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला. ही घटना ताजी असताना आता भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खेड तालुक्यातील राजकीय कलाटणी देणारी ठरत आहे. तालुक्यात शिवसेना आमदार एका टोकाला आणि भाजप कार्यकर्ते एका टोकाला असे काम सुरू आहे.
खेड तालुक्यात शिवसेनेची ताकद मागील काही काळ वाढली होती; मात्र पक्षातील काही कार्यकर्ते बाजूला पडल्याने पक्षातील कार्यकर्त्यात मतभेद निर्माण झाले आहेत. दोन गटात पक्षाचे काम सुरु असल्याची कुणकुण असल्याने पक्षाकडे एक गट येत्या विधानसभेला तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रवादीत गेली 15 वर्षे गटतटाचे राजकारण सुरुच आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेते माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे विरोधक बनले आहेत त्याचाच फटका मागील विधानसभेत मोहितेंना बसला आहे. तालुक्यात राष्ट्रवादी प्रबळ पक्ष असताना काही नेत्यांनी शिवसेनेला मदत केल्याने दिलीप मोहिते यांना अपयश आले हे सर्वज्ञात आहे. असे असले तरी मोहिते यांची ताकद आजही तालुक्यात मोठी आहे, या ताकदीच्या जोरावर ते पुन्हा आमदार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यातील चढाओढीचा फायदा भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत उठविणार असे चित्र आहे.
युती, आघाडी झाली तरी भाजप नेते तालुक्यात तटस्थ भूमिका घेतील असे चित्र आहे. देशात युती आहे, राज्यातही आगामी विधानसभा निवडणुकीत युती होईल.तरी आता जिल्ह्यात भाजपकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच सोमवारी भाजपच्या उमेदवारांच्या मुलाखती झाल्याने चर्चा रंगल्या आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात तब्बल पाच नेत्यांनी मुलाखती दिल्याने तालुक्यातील आगामी निवडणुकीच्या राजकारणाला रंग चढला आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख हेच भाजपकडून तालुक्यात प्रबळ दावेदार असले तरी त्यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे, रामदास मेदनकर, राहुल चितळकर, पांडुरंग शितोळे यांनी मुलाखती दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी सेना भाजप यांचे प्राबल्य तालुक्यात असले तरी कॉंग्रेस, मनसे आणि नव्याने अस्तित्वात आलेली वंचित आघाडी ज्यांना “सपोर्ट’ करेल त्याच पक्षाचा “आमदार’ होणार हेही तितकेच खरे आहे.
…अन् ते बळ भाजपकडे झुकले
खेड तालुक्यात अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. त्यानंतर जनतेने बदल घडवत मागील विधान सभेला शिवसेनेला पसंती दिली अर्थात त्यासाठी तालुक्यातील दिलीप मोहिते विरोधात सर्व पक्षीय नेते एकत्र आले होते. त्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले. हे बळ विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मात्र, कमी-कमी होत भाजपकडे झुकले आहे. आज तालुक्यात कधीही न दिसणारा भाजप पक्ष प्रबळ होत चालला आहे. जर निवडणुका सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचे ठरवले तर तालुक्यात “कमळ’ फुलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.