पुणे – पुणे शहरात प्रत्येक मोठ्या चौकामध्ये भिक्षेकऱ्यांच्या टोळ्या उभ्या असलेल्या दिसतात. लहान मुलांपासून ते अगदी तृतीयपंथीयांपर्यंत अनेकजण सिग्नल थांबलेल्या वाहन चालकांकडे पैशाची मागणी करतात. यातील काही जबरदस्तीने तर काही मुद्दाम अंगाला हात लावत आणि कपडे ओढत भिक्षा मिळवण्याचा प्रयत्न करतात.
तर काही जण फडक्याने गाडीची काच पुसून पैशाची मागणी करतात. शहरातल्या प्रत्येक भागात हे दृश्य दिसते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेच्या मते शहरात एकही भिकारी नाही. यामुळे येरवडा येथील भिक्षेकरी केंद्र ओस पडले आहे. तेथे जे काही भिकारी आहेत, ते सर्व मुंबईतून कारवाई करून आणलेले आहेत.
फुलेनगर येथे महिला व बाल आयुक्तालयाअंतर्गत भिक्षेकरी स्वीकार केंद्र आहे. येथे पोलिसांकडून कारवाई केलेल्या भिक्षेकऱ्यांना ठेवले जाते. त्यांना रितसर व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी मिळवून दिली जाते. यासाठी काही स्वयंसेवी संस्था येथे प्रशिक्षण देण्यासाठी येतात. येथे १०० पुरुष आणि १५ महिला भिक्षेकरी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या २३ भिक्षेकरी राहतात, तेही सर्व मुंबईतून कारवाई करून आणलेले आहेत.
भिक्षेकरी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की जून महिन्यात पुणे पोलिसांनी शिवाजीनगर येथून कारवाई करून आणले होते. त्यानंतर एकही भिक्षेकरी येथे दाखल करण्यात आला नाही. आम्ही पुणे पोलिसांना वारंवार पत्र पाठवली आहेत. सध्या चौकाचौकात अनेक भिक्षेकरी दिसतात. जे पैसे मागतात ते भिक्षेकरीच आहेत. त्यांना येथे दाखल केल्यास योग्य ते प्रशिक्षण देऊन भिक्षा न मागता रोजगाराची संधी मिळवून दिली जाते. महिला भिक्षेकऱ्यांना त्यांच्या लहान मुलांसोबत राहण्याची सोयही आहे. सरकारकडून भिक्षेकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात.
तर दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही २०२३ मध्ये ६३ भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली आहे. मागील वर्षी ३१ ऑक्टोबर रोजीही भिकाऱ्यांवर कारवाई केली होती. या सर्व भिक्षेकऱ्यांना पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिस ठाण्यांच्या ताब्यात दिले होते. भिक्षेकऱ्यांना पकडल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले जाते आणि न्यायालय त्यांना भिक्षेकरी केंद्रात हलवण्याचे निर्देश देते.
भिक्षेकऱ्यांची बाजू लढवतात वकील
भिक्षेकऱ्यांनी न्यायालयात त्यांचे खटले लढण्यासाठी वकिलांची सेवा घेणे सुरू केले आहे. त्यांचे वकील न्यायालयात दावा करतात की हे भिक्षेकरी भीक मागत नाहीत. तर, सिग्नलवर विविध वस्तू विकून त्यांची कमाई करतात. वस्तू विक्री करुन ते उपजीविका करत असल्याने ते भिक्षेकरी नाहीत. हा दावा अनेकदा न्यायालयात मान्य होतो. यामुळे पोलिसांनी कारवाई करूनही ते पुन्हा सिग्नलवर भीक मागताना दिसतात. दरम्यान लहान मुले विकत घेऊन त्यांच्याकडून भीक मागवून घेण्याचे प्रमाण मोठे आहे.
काही महिन्यापूर्वीच येरवडा पोलीस ठाण्यात असाच एक गुन्हा दाखल झाला होता. तेव्हा लहान मुलीची भिक्षेकऱ्यांच्या टोळीच्या तावडीतून सुटका करण्यात आली होती. या मुलीला गरीबीमुळे तीच्याच आई वडिलांनी विकले होते. कमी भिक मिळाल्यास लहान मुलांना उपाशी ठेऊन मारहाण केली जाते. व्यवसायीकरित्या भिक्षा मागणाऱ्या अनेक टोळ्या कार्यरत आहेत. मात्र, कागदोपत्री शहरात एकही भिक्षेकरी नाही, यामुळे भिक्षेकरी केंद्रात मुंबईतील भिक्षेकरी आणून ठेवायची वेळ आली आहे.