रस्त्याची नावाखाली शेकडो वर्षांची झाडे पाडली, काही ठिकाणी उभी जाळली
विजय सपकाळ
मेढा : जावळी म्हटलं की घनदाट जंगल, वनराई संपदा आणि सर्व मंगलमय वातावरण अशी कल्पना डोळ्यात येते नव्हे तर अशीच होती. मात्र तालुक्याला वनविभागाचेच ग्रहण लागलय की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. परवानगीच्या नावाखाली दुर्मिळ वृक्षांची कत्तल, दुसरीकडे वनविभाच्या दुर्लक्षामुळे वणव्यामध्ये शेकडो झाडे, पशु, पक्षी, प्राणी यांची जळून राख होत असताना वन विभाग नेमका काय करतोय काय ? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे. रस्त्याची नावाखाली शेकडो वर्षांची झाडे पाडली तर काही ठिकाणी उभी जाळली फक्त कागदावर वृक्ष लागवड याकडे लक्ष कोण देणार आहे का ? असा सवाल जनता विचारत आहे.
शासनाकडून वृक्ष लागवडीची सक्ती केली जात असताना निसर्ग संपत्तीने नटलेल्या आणि वन औषधी असलेल्या जावली तालुक्यात वृक्ष तोडीचा हौदोस सुरू असून राजरोसपणे झाडांची कत्तल होताना दिसत आहे. जावली तालुका म्हणजे निसर्ग संपत्तीचा खजिना असून विविध प्रकारच्या औषधी वनस्पती येथील जंगलात सापडतात. मात्र, सध्या खैर, सावर, यासह इतर झाडांची तोडणीची लगबग सुरु आहे. सामान्य शेतकऱ्यांना पैशाचे अमिष दाखवून आणि वन विभाग आमच्या खिशात असल्याचे भासवून व्यापारी आणि दलाल संगनमताने झाडांवर डल्ला मारताना दिसत आहेत.
वृक्ष तोडीचा पर्जन्यमानावर परिणाम झाल्याने एकीकडे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे तर दुसरीकडे व्यापारी व दलाल यांच्या भुलभुलैयाला बळी पडून पैशाच्या आमिषाला शेतकरी फसत आहेत. तालुक्यातील वन विभागाकडून गांधारीची भुमिका पार पाडली जात असताना वरिष्ट कार्यालय मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या हलगर्जीपणाचा आधार तालुका वन कार्यालय घेत असल्याने मांडवलीचा खेळ राजरोसपणे सुरु असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे .
जावली तालुक्यातील वन संपदा आर्थिक मांडवलीतुन संपुष्ठात येण्याचा धोका निर्माण झाला असून याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. सांगवी, भामघर असो कि या विभागातील कोणतेही गाव असो तेथिल डोंगर वृक्ष तोडीमुळे ओसाड दिसु लागले आहेत आणि यास वनविभाग जबाबदार असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
वृक्षमित्र, वनप्रेमी जनआंदोलन उभारणार
काहींना पाठीशी घालण्यासाठी वन अधिकारी कागदी घोडे नाचवुन केलेल्या अभिनंदनीय कामगिरीवर खुश होताना दिसत आहेत. हिरडा, साग, चिंच, आंबा , फणस , खैर, चंदन, ऐन , अंजन, जांभूळ आदी झाडांना शासनाने तोडण्यास मज्जाव केला आहे. मात्र, खैरांची तोड सुरु कोणाच्या परवानगीने होतेय हा प्रश्न निर्माण होत आहे. खैराची वन संपत्ती संपण्याच्या मार्गावर असून याला पायबंद घातला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे. वृक्षमित्र, वनप्रेमी व निसर्गप्रेमींची टीम लवकरच जावळीत येणार असून जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगण्यात आले.