नवी दिल्ली – गुजरात निवडणुकीसाठी भाजप आणि आपमध्ये संगनमत झाले आहे. आपचे उमेदवार भाजप ठरवतोय, असा आरोप शनिवारी कॉंग्रेसने केला. एवढेच नव्हे तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या आपच्या नेत्यांनी गुजरातमध्ये पैशांच्या बॅगा पोहचवल्याचा दावाही कॉंग्रेसने केला.
गुजरातमधील वजनदार नेते इंद्रनिल राजगुरू यांनी शुक्रवारी आपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये वापसी केली. त्यानंतर राजगुरू यांनी आज दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी विविध आरोप, दावे करत आपला घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशातून मी आपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्या दोन्ही पक्षांत संगनमत झाल्याचे दिसते.
मजबूत स्थितीत असणाऱ्या आपच्या 15 नेत्यांना उमेदवारी देण्याची मी मागणी केली. पण, निवडणुकीत भाजपला मदत होईल अशा पद्धतीने आपने तिकीट वाटप केले. मी त्याला विरोध दर्शवला. पण, मला कुठला आग्रह न धरण्याचे सांगण्यात आले. उमेदवारांची यादी गुजरातमधील भाजप कार्यालयातून येईल असेही मला सूचित करण्यात आले, असा दावा त्यांनी केला.
केजरीवाल आणि मान हे दोघे एका विशेष विमानातून 1 ऑक्टोबरला गुजरातमध्ये आले. त्यावेळी त्यांच्या समवेत पैशांचा बॅगा होत्या. एवढी रोकड कुठून आली, असे मी विचारल्यावर विमानाकडे बोट दाखवण्यात आले, असेही राजगुरू यांनी म्हटले.