मुंबई – आमच्या हाती केवळ चांगलं काम करणे आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होणार का ते जनता ठरवेल. माझ्या म्हणण्याने काही होणार आहे का? सर्व काही जनतेच्या हाती असते, अशी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका माध्यम समुहाच्या कार्यक्रमात बोलताना मांडली.
संबंधित कार्यक्रमात घेण्यात आलेल्या मुलाखतीवेळी शिंदे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. पुढील विधानसभा निवडणुकीपर्यंत आम्ही जनतेच्या भल्यासाठी कार्य करत राहू. मी आजही कार्यकर्ता बनूनच काम करतो. मुख्यमंत्रिपद मिळेल याची मलाही कल्पना नव्हती, असे त्यांनी म्हटले.
शिंदे यांनी याआधी भाजपचा उल्लेख महाशक्ती म्हणून केला होता. तो धागा पकडून मुलाखतकाराने महाशक्तीचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर शिंदे उत्तरले, महाशक्ती सुरूवातीपासूनच पाठिशी आहे. काय अडचण आहे त्यात? चांगलं काम करणाऱ्या झुंजार नेत्यांना ते संधी देतात. तशीच संधी मलाही दिली आहे. त्या संधीचा वापर मी जनतेची कामं करण्यासाठी करेन. स्वत:ची संपत्ती बनवण्यासाठी नाही.