रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ टी-२० विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा पहिलाच टी-२० विश्वचषक जिंकला होता. तेव्हा त्या संघात रोहित शर्मा देखील दोनच्या नेतृत्वात खेळला होता. २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर संघाला या स्पर्धेत आपले वर्चस्व मिळवता आलेले नाही. मात्र यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी चांगली राहिली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या ९०व्या वार्षिक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी चेन्नईला गेले होते. याठिकाणी पत्रकारांशी बोलताना त्यांना रोहित शर्माच्या कर्णधारपदाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर त्यांनी रोहित आणि धोनीची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. प्रत्येकाची कर्णधार पद सांभाळण्याची पद्धत वेगवेगळी आहे, असे बिन्नी यांनी म्हटले.
पत्रकारांनी रॉजर बिन्नी यांना रोहितच्या कर्णधारपदाची तुलना धोनी आणि कपिल देव यांच्याशी करण्यास सांगितले. या प्रश्नावर बिन्नी यांनी काहीच न बोलाने पसंत केले, मात्र ते नंतर म्हणाले की, “प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने संघाचे नेतृत्व केले आहे. रोहित हा अनुभवी खेळाडू असून, त्याने अनेक सामने खेळले आहेत. प्रत्येकाचा कर्णधारपद सांभाळण्याचा मार्ग वेगळा असतो. धोनी पूर्णपणे वेगळा आहे, तुम्ही त्याची कपिल देव किंवा गावस्करशी तुलना करू शकत नाही. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.” असेही रॉजर बिन्नी म्हणाले.
रविवारी भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना भारताने जिंकल्यास टीम इंडिया गट-ब मधून सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. गट-अ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाने नेदरलँड्सचा पराभव केल्यास त्यांचेही सेमीफायनलचे तिकीट पक्के होईल.