देशात तीन वर्षांत तब्बल 436 सैनिकांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विद्यार्थी, उच्चशिक्षित, कामगार, शेतकरी यांच्या आत्महत्येच्या बातमीने तर एकही दिवस जात नाही. या आत्महत्येवर काही उपाय नाही का?
व्यावसायिक विविधता, वैयक्तिक भिन्नता, वैयक्तिक प्रयत्नांना संधी या आधुनिक समाजातील गोष्टी उपलब्ध असूनही मानव समाधानी नाही. सध्याचे आत्महत्येचे प्रमाण चक्रावून टाकणारे आहे. याला समाजातील काही अपमान्य घटक कारणीभूत आहेत. सध्याच्या काळात व्यक्ती स्वतःचा विचार अधिक करते. पण यामुळे समाजाचा विचार मागे पडतो. समाज जितके देऊ शकतो त्यापेक्षा अधिकाची मागणी व्यक्ती करतो.
डुरखाइमच्या मते, “आत्महत्या म्हणजे मृत्यूची अशी प्रत्येक घटना होय जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, होकारात्मक किंवा नकारात्मक अशी कृती होय की, जिचा अंतिम परिणाम मृत्यू हा असतो.’ आत्महत्या एक वैयक्तिक घटना-एखादी व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत स्वतःचा शेवट करते. अनेक डॉक्टर आणि मानसोपचारतज्ज्ञ आत्महत्येचा अभ्यास करतात आणि आत्महत्येचे मानसिक विश्लेषण करतात. त्यांच्या मते, आत्महत्या करणाऱ्या बहुतेक व्यक्तींची मनःस्थिती सामान्य नसते, त्यांचा कल त्यामुळे आत्महत्या करण्याकडे होतो. व्यक्तीला आत्महत्येचा निर्णय घ्यायला लावणारी कारणे मानसिक असतात तशीच ती सामाजिकही असतात. आपण आता समाजात कसे जगायचे? हा विचार प्रामुख्याने आत्महत्येमागे असतो. काही आत्महत्या या अनुकरणामुळेही होतात, पण त्यांचे प्रमाण खूपच कमी आहे.
आत्मकेंद्रित आत्महत्या, परार्थवादी आत्महत्या आणि नियमनरहिततेमुळे केलेली आत्महत्या असे आत्महत्येचे तीन प्रकार डुरखाइमने केले आहेत. आत्महत्येचा पहिला प्रकार आत्मकेंद्रित आत्महत्या हा आत्महत्येचा दर आणि धर्म, कुटुंब, विवाह आणि मुले यांसारखे बांधणारे सामाजिक धागे यामधील परस्परसंबंधामधून निर्माण होतो. वयानुसार आत्महत्येच्या दरात फरक पडतो. वयानुसार आत्महत्येचे प्रमाण वाढते. स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. विवाहित व्यक्तींपेक्षा अविवाहित, घटस्फोटित, विधवांमध्ये, विधुरांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. विवाहित व्यक्तींमध्येही मूल नसणाऱ्या व्यक्तींमध्ये मूल असणाऱ्या व्यक्तींपेक्षा आत्महत्येचे प्रमाण जास्त असते. कारण अशा व्यक्तींना बांधणारा दणकट धागा नसतो. व्यक्तीच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढते. घटस्फोटाचे स्त्रीवर गंभीर परिणाम होतात मात्र पुरुषांवर अधिक गंभीर परिणाम होतात. घटस्फोट हा स्त्रीपेक्षा पुरुषासाठी अधिक धोकादायक असतो. विवाहाद्वारे येणारे स्थैर्य, समाधान घटस्फोटामुळे मात्र विस्कळीत होते.
आर्थिक संघर्षाच्या, चणचणीच्या काळात जसे आत्महत्येचे प्रमाण वाढते तसेच आर्थिक भरभराटीच्या काळातही आत्महत्येचे प्रमाण वाढते. सध्याच्या काळात कधीही न संपणारी स्पर्धा असते, अपेक्षा जास्त असतात. अपेक्षा आणि अपेक्षापूर्ती यामध्ये मोठे अंतर पडते. अस्वस्थता आणि अपेक्षाभंगाचे हे वातावरण आत्महत्येची भावना निर्माण व्हावयास कारणीभूत होते. उदासीनता, जीवनाशी जवळीकतेचा अभाव यामुळे व्यक्ती आत्मकेंद्रित आत्महत्येकडे वळते. अतिउत्साह आणि अतिप्रेम यामुळेही व्यक्ती आत्महत्येकडे वळते. तर समाजातील न सहन होणारा त्रास यामुळेही व्यक्ती टोकाचे पाऊल उचलते.
आत्महत्या ही वैयक्तिक घटना होय; पण तिची कारणे सामाजिक असतात. आत्महत्येचा उगम वैयक्तिक नाही तर सामाजिक घटकांमुळे होतो. मानसशास्त्रीय घटकांमुळे व्यक्ती आत्महत्या करीत असल्या तरी सामाजिक परिस्थिती हे घटक निर्माण करतात. ही सामाजिक कारणे भिन्न असतात. घटनांचा आधार समुदाय असतो व्यक्तींची गोळाबेरीज नाही. एकत्रितरित्या व्यक्ती घटनांना जन्म देतात. विशिष्ट सामाजिक घटना वैयक्तिक घटनांवर नियंत्रण ठेवतात. सामाजिक घटक जरी व्यक्तीला मृत्यूकडे नेतात; परंतु प्रत्येकाला असे वाटते की आपण आपल्या मर्जीनुसार मृत्यूकडे चाललो आहोत.
सद्यस्थितीत आत्महत्या हा देशापुढील ज्वलंत प्रश्न आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून उचित पाऊल उचलले गेले पाहिजे. तसेच वैयक्तिक स्तरावर कुटुंब किंवा जवळच्या माणसांचे जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत झाले पाहिजे. आर्थिक संकटं येतात, त्यातून मार्ग काढता येतो, प्रत्येक कुटुंबात काहीतरी समस्या असतातच, त्यातूनही मार्ग काढता येतो, विद्यार्थ्यांना काही आयुष्यभर परीक्षा द्यायच्या नसतात. श्रीमंतांनी अधिक हाव तर गरिबांनी अधिक हतबल होऊ नये. वेळ, काळ बदलतो. परिस्थितीही बदलते. पुन्हा आनंदी वेळ आयुष्यात येते; पण एकदा गेलेला जीव पुन्हा येतो का? विचार करा.