कॉपी करण्यात काय वाईट आहे? आपले पूर्वज म्हणजे वानर “अनुकरणप्रिय’ म्हणूनच प्रसिद्ध आहेत. आपल्याकडे अनेक संगीतकार जुन्या गाण्यांच्या चाली कॉपी करतात आणि ही कॉपी नसून “इन्स्पायरेशन’ आहे, असं बिनदिक्कत सांगतात.
नवोदित गायक जुन्या, लोकप्रिय गायकाचा आवाज “कॉपी’ करतात आणि “हुबेहूब आवाज आहे बरं का,’ अशा शब्दांत दादही मिळवतात. थोड्याच कालावधीत त्यांचं करिअर बनून जातं. एवढंच नव्हे तर आपल्याकडे राज्य पातळीवरचे नेते राष्ट्रीय नेत्याच्या शैलीची कॉपी करतात. या प्रक्रियेत बोलण्या-वागण्यापासून भाषणातल्या क्लृप्त्यांपर्यंत आणि धोरणांपासून योजनांपर्यंत असंख्य गोष्टींची कॉपी केली जाते. वाङ्मयचौर्याच्या तक्रारी तर आपल्याकडे पूर्वीपासूनच होतायत. आता सोशल मीडियाच्या महापुरात कोण ओरिजिनल आहे आणि कोण कॉपी करतोय, हे ओळखणंही कठीण झालंय. अशा पार्श्वभूमीवर, परीक्षेतच कॉपी करायला अटकाव का असावा, असा काहीजणांचा प्रामाणिक समज झालेला दिसतो.
त्यातूनच शासनाच्या “कॉपीमुक्त अभियान’चा प्रवास कॉपी करू दिली नाही म्हणून परीक्षा केंद्रावर झालेल्या हल्ल्यापर्यंत पोहोचला. नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात टाकळी-मानूर गावात भरारी पथकाचं जे काही झालं, ते इमानदारीत परीक्षा देणाऱ्यांसाठी धक्कादायकच म्हणावं लागेल. या गावातलं दहावीचं परीक्षा केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न “कॉपीसमर्थक’ गटानं केला. असा प्रयत्न गांधीवादी मार्गानं झाला असण्याची शक्यताच नाही. कॉपीविरोधी पथकाला “भरारी’ची किंमत मोजायला लावणारा हा प्रयत्न होता.
बुधवारी इतर केंद्रांप्रमाणंच याही केंद्रावर दहावीचा भूमितीचा पेपर सुरू होता. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रयत्न एक “जमाव’ करत होता आणि त्यासाठी जमावानं परीक्षा केंद्रात घुसखोरीही केली. भरारी पथकातल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना धमकावून “कॉप्या पुरवण्याची परवानगी द्या,’ अशी रोखठोक मागणी या मंडळींनी केली. भरारी पथक अशी परवानगी देणं शक्यच नव्हतं. नकार मिळताच जमावानं लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर सुरू केला. भरारी पथकात पंचायत समितीचे अभियंता आणि गटविकास अधिकारी जखमी झाले.
कॉपी हा हक्कच असल्याप्रमाणं होत असलेल्या या वर्तनाचं आपल्यासारख्यांना आश्चर्य वाटतं; पण राज्याच्या काही भागांत कॉपी करणं हा हक्क मानणाऱ्यांची मेजॉरिटी आहे म्हणे! शाळेच्या खिडक्या-गॅलऱ्यांना लटकून कॉप्या परीक्षार्थींपर्यंत पोहोचवणं, हा तर दहीहंडीसारखा “साहसी खेळ’ म्हणून जाहीर केला जावा, अशीही या मंडळींची मागणी असू शकते. कॉपीमुक्त अभियानात शाळा-कॉलेजांच्या परिसरातली झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. पण व्हॉट्स-ऍपच्या जमान्यात झेरॉक्सला विचारतो कोण? मोबाइलच्या माध्यमातून पेपरफुटीच्या घटना सतत समोर येत राहिल्या. कॉपीला तर अजिबातच पायबंद घालता आला नाही. कॉपी करू दिली नाही म्हणून परीक्षा केंद्रावरच हल्ला, हा कळसाध्याय!
परिसरात यापूर्वीही अशा घटना घडल्यात. “आमच्या पाल्यांना कॉपी करू द्या; अन्यथा तुम्हाला जिवे मारू,’ अशा धमक्या केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांना दिल्याची घटना एका केंद्रावर घडल्याची माहिती तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच ट्विटरवरून दिली. कॉपी आणि पेपरफुटीच्या घटना अशाच वाढत राहिल्या तर “मेरीट’ नावाची वस्तू नामशेष होईलच; शिवायही “भलती भरारी’ आणखी उंच जाईल. कॉपी हा हक्कच मानण्याची मानसिकता आली कुठून, हे शोधण्याचे कष्ट कुणी घेईल?