सध्याचा राजकीय गोंधळ पाहता आपण लोकशाहीच गमावतो की काय, अशी भीती वाटते आहे. जवळपास सर्वच बाबींमध्ये राजकारण घुसवल्यामुळे आजची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र जनतेत वैचारिक पेरणी केल्यास लोकशाही वाचवता येईल.
असा एक काळ होता की भारतात पुष्कळ लोकसत्ताक राज्ये होती. ज्या प्रदेशात राजेशाही होती तेथेही राजेलोक लोकांच्या मताने नेमले जात किंवा त्यांच्या अधिकारांवर नियंत्रण घातलेले असे. बौद्धभिक्खू संघाचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना हेच दिसून येईल की, हे संघ म्हणजे मूर्तिमंत लोकसभा होत्या. कारण आजकालच्या लोकसभेमध्ये ज्या नियमबद्ध बाबी पाळण्यात येतात त्या सर्व बाबी बौद्धभिक्खू संघाच्या बैठकीत पाळण्यात येत असत. भिक्खूंनी कोठे बसावे, ठराव कोठे मांडावेत, भाषणे कशी करावीत, किती भिक्खू हजर असले तर संघाचे कामकाज चालवावे, संघाचा सूत्रधार कसा असावा, मतदानाची मोजदाद कशी करावी इत्यादी बाबींविषयी संघाचे नियम ठरलेले असत. हे लोकसभाप्रणीत नियम बुद्धांनी आपल्या संघाच्या कामकाजासाठी वापरले. नंतरच्या काळात लोकशाहीप्रणीत पद्धती भारताने गमावली, आता पुन्हा ती गमावणार की काय हे सांगता येत नाही. कारण, लोकशाही कारभार चालवीत असताना हुकूमशाहीला आमंत्रण देण्याचाच प्रकार दिसून येत आहे. भारतात लोकशाही आपले बाह्यांग शाबूत ठेवून आहे परंतु अंतरंग हुकूमशाहीप्रकारचे वाटते.
लोकशाहीला अंतर्बाह्य स्वरूपात आणि प्रत्यक्ष व्यवहारात आपणाला ठेवण्याची इच्छा असेल तर आपण काय केले पाहिजे? लोकशाहीचे अस्तित्व आपणाला टिकवायचे असेल तर आपण पहिली गोष्ट केली पाहिजे ती ही की, आपले सामाजिक आणि आर्थिक उद्देश साध्य करण्यासाठी आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. याचा अर्थ असा की, क्रांतीचे घातपाती मार्ग आपण वर्ज्य केले पाहिजेत. आता असनदशीर मार्गांचा अवलंब यथार्थ ठरणार नाही. हे असनदशीर मार्ग म्हणजे बेबंदशाहीची आमस्थाने होत. हे मार्ग आपण जेवढ्या लवकर वर्ज्य करू तेवढे आपणाला अधिक हितावह होणार आहेत.
लोकशाहीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणाला दुसरी जी गोष्ट करावयाची आहे ती ही की लोकशाहीचा झेंडा सतत उंच ठेवण्यास जे इच्छुक आहेत त्याच्यासाठी जॉन स्टुअर्ट याने जो भयसूचक संदेश दिलेला आहे तो पाळणे ही होय. तो संदेश असा, “आपल्यातील एखादा माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या चरणी आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याची सुमने वाहू नयेत’ ज्यांनी आयुष्यभर आपल्या मायभूमीची सेवा केलेली आहे, अशा थोर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत. याबाबतीत आयर्लंडचा देशभक्त डॅनियल ओ कोनेल याने मार्मिकपणे म्हटलेले आहे की, “स्वाभिमानाचा बळी देऊन कोणताही मनुष्य कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. स्वातंत्र्याचा बळी देऊन कोणतेही राष्ट्र कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही.’
या भयसूचक संदेशाची जरुरी इतर कोणत्याही देशापेक्षा भारत देशाला जास्त आहे. याचे कारण असे की, भारताच्या राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही भावना जितकी दृढ आहे तितकी ती जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात नाही. एखाद्याने राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा दाखविली तर ती त्या राजकीय पंथात हुकूमशाहीची सत्ता प्रस्थापित करील.
लोकशाहीचे अस्तित्व अभंग राखण्यासाठी जी तिसरी गोष्ट आपणाला करावयाची आहे ती ही की आपण राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे. सामाजिक लोकशाहीमुळे राजकीय लोकशाहीचे अस्तित्व चिरंजीवी होऊ शकेल. एरवी नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची जीवनसत्त्वे होत. हे मान्य करणारी पद्धती. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व ही तत्त्वे म्हणजे त्रिवेणी संगमातील निरनिराळे भाग होत, असे मानता येत नाही. ही तत्त्वे त्रिवेणी संगमात ऐक्य साधून आणतात. ती एकमेकांपासून अलग केली तर लोकशाहीचे जीवनसत्त्व नष्ट केल्यासारखे होते. समतेपासून स्वतंत्रतेला अलग केले तर लोकशाहीचे जीवनसत्त्व नष्ट केल्यासारखे होते. समतेपासून स्वतंत्रतेला अलग करता येत नाही व स्वतंत्रतेपासून समतेला अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे स्वतंत्रता आणि समता यांना बंधुत्वापासून अलग करता येत नाही.
स्वातंत्र्याच्या जोडीला समता नसेल तर नुसते स्वातंत्र्य मूठभर लोकांची सत्ता सर्वांवर प्रस्थापित करू शकेल. समतेच्या जोडीला स्वातंत्र्य नसेल तर नुसती समता वैयक्तिक कर्तृत्वशक्तीची ज्योत मालवून टाकील. भारतातील सामाजिक परिस्थितीत दोन्ही तत्त्वांचा अभाव आहे. हे मान्य करूनच आपण सामाजिक लोकशाही निर्माण करण्यास सुरुवात केली पाहिजे. आर्थिक बाबतीत पाहावयाचे तर भारतातील समाजात काही लोकांच्या घरी गजांतलक्ष्मी वावरत आहे, तर बहुसंख्य लोकांच्या घरात अठरा विश्व दारिद्य्र नांदत आहे. अशा परस्पर विरुद्ध स्वरूपाच्या घटनांनी भरगच्च भरलेल्या आपल्या राष्ट्रीय जीवनास राजकीय बाबतीत आपणाला समता मिळणार आहे. पण सामाजिक आणि आर्थिक बाबतीत आपणामध्ये असमता आहे. एका माणसाला एका मताचा अधिकार आणि एका मताची किंमत या तत्त्वाची जाणीव आपणाला राजकीय बाबतीत आहे. सामाजिक व आर्थिक बाबतीत समता प्रस्थापित करण्याची टाळाटाळ आपण आणखी किती काळ करणार आहोत? ही टाळाटाळ आपण जर पुष्कळ काळ चालू ठेवली तर आपल्या राजकीय लोकशाहीचे जीवित धोक्यात ठेवूनच ही टाळाटाळ आपणाला टिकवता येईल. ही परस्पर भिन्नतादर्शक परिस्थिती शक्य तो लवकर आपण नष्ट केली पाहिजे. आपण बंधुभावाचे तत्त्व आचरणात पाळीत नाही ही आपणामधील दुसरी उणीव होय. सामाजिक जीवनात ऐक्याचे अमृतसिंचन जर कोणते तत्त्व करीत असेल तर ते बंधुभावाचे तत्त्व होय. बंधुभाव अस्तित्वात नसेल तर समता व स्वातंत्र्य यांच्या अस्तित्वाला काय अर्थ राहणार?
सत्ताधीशांच्या टाचेखाली चेंगरलेले लोक आता कंटाळून गेलेले आहेत. त्याचे रूपांतर वर्ग कलहात अगर वर्गयुद्धात होऊ देऊ नये. तसे होऊ दिले तर देशात वेळीचे पीक अमाप पिकेल अशी स्थिती ज्या दिवशी उत्पन्न होईल तो देशाचा घातवार ठरेल. कारण छिन्नविच्छिन्न झालेले घर फार काळ टिकू शकत नाही, असे अब्राहम लिंकनने म्हटलेलेच आहे. म्हणून लोकांना आपले स्वयंसिद्धपणाचे ध्येय साध्य करून घेण्यासाठी देशाच्या प्रगतीचे पोषक वातावरण असावे. लोकशाही सत्ता व तत्त्वे पाळण्यात आली तरच ही परिस्थिती निर्माण करता येईल.
काळ दिवसेंदिवस झपाट्याने बदलत आहे. इतर लोक व आपले लोक हे नव्या नव्या मतप्रणालीची कास धरीत आहेत. लोकांनी चालविलेले आणि लोकांसाठी चालविलेले राज्य या तत्त्वाची मूर्ती आपण ज्या घटना मंदिरात प्रस्थापित केलेली आहे ते घटनामंदिर आपल्याला जर पवित्र वातावरणात सुरक्षित ठेवायचे असेल तर आपल्या पुढील मार्गात कोणत्या अनिष्ट गोष्टींची धोंड पडून राहिलेली आहे हे समजावून घेण्यास आपण वेळ घालविता कामा नये. लोकांनी चालविलेल्या राज्यापेक्षा “लोकांसाठी’ चालविलेले राज्य चांगले अशी जनतेत जागृती व्हावयास हवी.