मुंबई – करोनाच्या रुग्णसंख्येत दररोज शेकड्यांनी वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. शासनाने राज्यातील काही भाग सीलबंद करण्याचे निर्णय घेतले आहेत. बंदी आदेश जारी केले आहेत. आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन तुरुंगात टाकलं जाईल. करोनाच्यासंदर्भात शासन यापुढे अधिक धोका पत्करणार नाही, असा इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे.
अजित पवार म्हणाले कि, लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हनुमानाने औषधी झाडासह संपूर्ण पर्वत उचलून आणल्याचं वर्णन रामायणात आहे. आज जनतेला करोनापासून वाचवण्यासाठी हनुमानासारखे पर्वत उचलण्याची नाही तर घरातच थांबण्याची गरज आहे. तसेच मुस्लीम बांधवांनीही शब्ब-ए-बारातसाठी घराबाहेर पडू नये, घरातंच थांबावं असंही त्यांनी म्हटलं आहे.
करोनाची साखळी तोडणं आणि नागरिकांचा जीव वाचवणं हे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपासून देशातील प्रत्येक व्यक्तीचं आज एकमेव कर्तव्यं आहे. त्यासाठी घराबाहेर न पडणं, बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात न येणं, करोनाला प्रसाराची संधी न देणं आणि करोनाची साखळी तोडणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पुढील सूचना येईपर्यंत सण, उत्सव, पूजा, अर्चा, यात्रा, जत्रा, प्रार्थना, धार्मिक कार्ये ही घरातंच करावीत, कुणीही घराबाहेर पडू नये, असे त्यांनी सांगितले आहे.