इस्लामाबाद – सज्जनांचा खेळ अशी ओळख असलेल्या क्रिकेटची ही प्रतिमा गेल्या काही वर्षांत झालेल्या काही घटनांमुळे मलिन झाली आहे. जे खेळाडू क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार करतात, मॅच फिक्सिंग करतात, बुकींशी व सट्टेबाजांशी संधान साधतात त्यांची नावे समोर आली, त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले तर अशा खेळाडूंना फाशीची शिक्षा देण्यात यावी तरच हा खेळ स्वच्छ राहील, असे मत पाकिस्तानचे माजी कसोटीपटू जावेद मियांदाद यांनी व्यक्त केले आहे.
मॅच फिक्सिंग तसेच अन्य गैरप्रकार करणारे खेळाडू आपल्या कुटुंबाची, संघाची, देशाची एक प्रकारे फसवणूकच करतात. त्यांची श्रद्धा खेळावर आणि देशावर नसून केवळ त्यातून मिळत असलेल्या आर्थिक फायद्यावर असते. त्यामुळे असे खेळाडू सापडले तर त्यांच्यावर कोणतीही दयामाया दाखविली जाऊ नये. हा खेळ स्वच्छ राहण्यासाठी अशा खेळाडूंना अत्यंत निर्दयीपणे वागविले गेले तरच नवोदीतांना एक संदेश जाईल व कोणाचीही असा भ्रष्टाचार करण्याची हिंमतच होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
कोणत्याही देशाचा खेळाडू असो तो जर अशा गैरप्रकारात गुंतला असल्याचे सिद्ध झाले तर त्याला फाशी द्यावी व जगभरात योग्य तो संदेश द्यावा. फिक्सिंग किंवा सट्टेबाजी हा एक प्रकारचा देशद्रोहच आहे, त्याला तशाच शिक्षेने लगाम घालता येईल, अन्यथा क्रिकेट भ्रष्टाचाराचे प्रमुख केंद्र बनायला वेळ लागणार नाही.
अकमलमुळे प्रतिमा डागाळली
पाकिस्तानचा कसोटीपटू उमर अकमल याच्यावर याच प्रकरणी आरोप निश्चित झालेले आहेत. त्याने जरी या आरोपांना आव्हान देणार नसल्याचे सांगितले असले तरीही त्यालाही दया दाखविण्यात येऊ नये. कठोरातील कठोर जी कोणती शिक्षा आहे ती अकमलला देण्यात यावी, असेही मियांदाद यांनी स्पष्ट केले.