मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटामधून केरळमध्ये धर्मांतराचा सर्व प्रकार समोर येणार आहे. लव जिहादच्या नावाखाली महिलांचे होणारे शोषण आणि सद्यस्थिती सारख्या विषयावर भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाला प्रोपगंडा पसरवणारा चित्रपट देखील म्हंटले गेले. मात्र मोठ्या वादानंतरही हा चित्रपट 5 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने मोठी कमाई देखील केली आहे. नुकतेच या चित्रपटाबाबत अभिनेत्री कंगणा राणावतने प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत कंगना म्हणाली, “मी चित्रपट पाहिला नाही, पण चित्रपटावर बंदी घालण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने देखील या चित्रपटावर बंदी घातली जाऊ शकत नसल्याचे मी आजच वाचले आहे. मला असं वाटतं की ते कोणालाही वाईट दाखवत नाहीत. तर ते फक्त ISIS दाखवत आहे. जर उच्च न्यायालय देशाची सर्वात जबाबदार संस्था असं म्हणत असेल तर ते बरोबर आहे.”
पुढे ती म्हणाली, “ISIS ही एक दहशतवादी संघटना आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ती दहशतवादी संघटना नाही, तर तुम्ही देखील दहशतवादी आहात. कायदेशीर, नैतिकदृष्ट्या तिला दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.”
दरम्यान, मुलींचे धर्मांतर त्याभोवती फिरणारे राजकरण, त्यात अडकलेल्या मुलीची व्यथा आणि तिच्या कुटुंबाला सहन करावा लागणार त्रास हे सर्व केरळ स्टोरीमध्ये दाखवण्यात आले आहे. केरला स्टोरीमधून बेपत्ता झालेल्या 32 हजार महिलांबाबतची कहाणी सर्वांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले असून विपुल अमृतलाल शाह यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अदा शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7.5 कोटी कमावले आहेत.