शिंदे वासुली – चंगळवाद आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याच्या शर्यतीत व्यस्त असलेल्या मानवजातीला मनःशांती व सन्मार्गाला लावण्यासाठी ज्ञानाई माउली व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या आध्यात्मिक विचार तत्त्वांची गरज आहे, तरच समाजाचा उद्धार होईल, असे हभप शंकर महाराज शेवाळे यांनी आपल्या काल्याच्या कीर्तनातून समाजोपदेश केला. चाकण एएमआयडीसीतील औद्योगिक क्रांतीमुळे प्रगतीपथावर असलेल्या भांबोली (ता. खेड) गावाने आर्थिक सुबत्तेने जीवनशैली कमालीची बदलली असतानाही आपली धार्मिक व वारकरी सांप्रदायाची परंपरा जोपासत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.
हभप शंकर महाराज शेवाळे यांच्या काल्याचे कीर्तनाने सांगता झाली. भांबोलीच्या ग्रामस्थांनी 7 दिवस पहाटेची काकड आरती, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, नामसंकीर्तन, हरिजागर व सामुदायिक जेवणावळी असे भरगच्च धार्मिक व वारकरी सांप्रदायिक परंपरेचे नित्य नियमाचे कार्यक्रम असलेल्या गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.
यामध्ये हभप बाळशीराम महाराज मिंडे (कोहिंडे-खेड), युवा कीर्तनकार हभप चैतन्य महाराज वाडेकर (भांबोली-खेड), हभप सागर महाराज बोराटे(नाते पुणे), हभप पांडुरंग महाराज शितोळे(आळंदी देवाची), हभप कांचनताई महाराज जगताप(नाशिक), हभप विलास महाराज वाघ(केंदूर) अशा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नामवंत कीर्तनकार महाराजांची कीर्तनसेवा करण्यात आली. येथील सर्व ग्रामस्थांनी लोक वर्गणीतून या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले होते.