मुंबई – “राज ठाकरे तुम्ही उत्तम बोलता. मोठे नेते आहात. अभ्यास करण्याचा प्रयत्न करता, पण सगळ्याच बाबतीत तुम्ही बोलले पाहिजे आणि तुमचे बोलल्यावर खरेच असेल असे मानण्याच काही कारण नाही. व्यक्तिगत संबंधांमध्ये तुम्ही आमच्यावर टीका केली तर त्याला आम्ही उत्तर देणार नाही, पण तुम्ही आमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांवर टीका केल्यास तुमच्या विरोधात बोलायला मुलाहिजा ठेवणार नाही,’ असा इशारा मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार यांनी रविवारी दिला.
शेलार पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींनी 2 हजाराची नोट बंद करण्याचा निर्णय प्रामाणिकपणे घेतला आहे. मोदींवर देशातील प्रामाणिक नागरिकांवरचा हा विश्वास आहे. मोदींच्या निर्णयानंतर आता लगेच काही लोक बोलायला लागले आहेत. 2 हजाराच्या नोटेवरची बंदी ही धरसोडवृत्ती नसून जे सुटलेले आहेत त्यांना धरण्याचा हा कार्यक्रम आहे.
आरबीआयचे “क्लीन नोट पॉलिसी’ हे धोरण आहे, हे धोरण चर्चेअंती झाले आहे. ते विविध बैठकांमध्ये सादर झाले. ज्यावर तज्ञांनी आपली मते मांडली आहेत, त्या धोरणाच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी दोन हजाराची नोट बाजारात आली त्याचवेळी ही तात्पुरती व्यवस्था आहे असे आरबीआय आणि मोदीजींनी घोषित केले होते.
शेलार पुढे म्हणाले, 6 लाख 32 कोटींच्या नोटा बाजारात होत्या त्यापैकी 3 लाख कोटींच्या जर चलनात असतील, तर उरलेल्या 3 लाख 40 हजार कोटींच्या नोटा कुठे लपल्यात हे शोधणे प्रामाणिकपणाचे काम आहे, हे जनतेला हवे आहे. चोर पकडले गेले पाहिजेत. जे सुटले आहेत त्यांना धरले पाहिजे आता हे राज ठाकरे यांना सांगा असेही त्यांनी म्हटले.
काय होतास तू काय झालास तू
आशिष शेलार यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, मविआची बैठक होती. तिथे शरद पवार यांच्या खुर्चीच्या आजूबाजूला एकही खुर्ची नव्हती. त्यानंतर सोफ्यांची रांग होती. या सोफ्यावर बसलेल्या उद्धव ठाकरेंना आम्ही ज्यावेळी टीव्हीवर पाहिले तेव्हा मला “कोण होतास तू काय झालास तू…’ हे गाणे आठवले.