पिरंगुट – गेल्या दीड महिन्यापासून मुळशी तालुक्यात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, त्यामुळे अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. पुढील आर्थिक संकटांचा सामना कसा करावा, असा प्रश्न व्यापारी वर्गाला पडला आहे.
मुळशी तालुक्यात भूगाव, भूकुम, पिरंगुट, घोटावडेफाटा, लवळे, पौड, उरावडे, घोटावडे आदी भागांत अनेक लहान-मोठे व्यवसायिक आहेत. यामध्ये प्रामुख्याने हॉटेल, पान टपरी, कपडे विक्रीची दुकाने, हार्डवेअर, इलक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक दुकाने, फर्निचर, फळविक्रेते आदी व्यापारी दुकाने आहेत. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि वरील सर्व व्यवहार ठप्प झाले.
पुढील काळात अनेक मोठे सण आणि यात्रा होणार असल्याने मार्चदरम्यानच अनेक व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर दुकानातून माल भरला होता. मात्र लॉकडाऊनमुळे माल दुकानातच पडून आहे.
फूल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
मुळशी तालुक्यात विविध फुलांची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ऐन हंगामात फुलांना मागणी नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे जवळपास पंधरा ते वीस लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मुळशी तालुक्यात इतर पिकांबरोबरच अनेक ठिकाणी फूल शेती केली जाते. कोळवण खोरे, मुळशी रोड, भादस खोरे, लवळे आदी भागांत शेतकरी पॉलिहाऊसमध्ये, तसेच शेतात फुलांचे उत्पादन घेत आहे. यामध्ये झेंडू, गुलाब, जरबेरा, अष्टर, बिजली आदी फुले केली जातात. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो. मात्र सध्या सर्वत्र बाजारपेठाच बंद असल्याने हा हंगामच संपला असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला. याबाबत शेतकरी अशोक माझिरे म्हणाले की, फुले तोडणीचा काळ होता. लग्न हंगाम, यात्रा जत्रा तसेच मंदिरे बंद असल्याने फुलांची मागणी घटली. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
परप्रांतीयांना गावाची ओढ
सरकारने परप्रांतियांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे गावाची ओढ लागली असून गावी जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र गरजेचे असल्याने परप्रांतीय नागरिकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे मुळशीतील अनेक उद्योग दीड महिने बंद होते. मुळशी तालुक्यात भूगाव, भूकुम, पिरंगुट, लवळे, माण, हिंजवडी, भरे, कासारआंबोली, उरावडे, पौड आदी भागांत मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामानिमित्त राहत आहे; परंतु गेले दीड महिने काम बंद असल्याने व त्यातच करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने या कामगारांना घरी जाण्याचे वेध लागले आहेत. सरकारने या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी प्रत्येकाचे मेडिकल प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. गावी परतण्याचे वेध लागल्याने मेडिकल प्रमाणपत्र घेण्यासाठी भुगाव, पिरंगुट, घोटावडेफाटा पौड येथील दवाखान्यात नागरिकांनी गर्दी केली होती.
लॉन शेतीला आर्थिक फटका
गेल्या दीड महिन्यापासून बंद आहेत, त्यामुळे मुळशी तालुक्यातील लॉन शेतीला मोठा आर्थिक फटका बसला आहे. भात पिकाचे आगार अशी मुळशी तालुक्याची ओळख आहे; परंतु अलीकडच्या काळात लॉन शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहे. तालुक्यातील चांदे, नांदे, मूलखेड, माण, म्हाळुंगे, हिंजवडी जवळच्या भागात मोठ्या प्रमाणावर लॉन शेती केली जाते. या गावातील जवळपास चारशे एकर क्षेत्रावर ही शेती आहे; परंतु सध्या लॉन्सला मोठी मागणी आहे. लॉन काढणीला आलेले आहे.
मात्र लॉकडाऊनमुळे वाहतुकीस परवानगी नाही. परिणामी विक्रीस आलेले लॉन शेतात पडून आहे. या गावातील लॉन शेती मालकाचे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावर अवलंबून असलेल्या जवळपास दीडशे शेत मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत प्रयोगशील व लॉन उत्पादक शेतकरी प्रमोद मांडेकर यांनी सांगितले की, मार्च ते एप्रिल महिन्यात लॉनला मागणी जास्त असते. नेमके लॉन विक्रीच्या काळातच लॉकडाऊन असल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन केला. त्यामुळे व्यापारी वर्गाचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले. हॉटेल, स्वीट होमचे तर खूपच नुकसान झाले. मिठाई माल खराब झाला. तालुक्यातील सर्व यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे जत्रेमुळे होणारा आर्थिक व्यवहार थांबला. गुढीपाडवा, हनुमान जयंती, अक्षय्यतृतीया हे मोठे सण साधेपणाने झाल्याने व्यापाऱ्यांच्या मालाला उठाव मिळालाच नाही. त्यात कर्जाचे हप्ते असल्याने पैसे आणायचे कोठून, हा प्रश्न आहे. दुकाने बंद पण तरी सुद्धा दुकानातील कामगार वर्गाचे पगार देणे खूप अवघड जात आहे.
– विशाल राऊत,
संस्थापक-अध्यक्ष, पौड व्यापारी संघ