शिवसेना: भाजप आणि फडणवीस यांच्यावर साधला निशाणा
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वाधवान कुटुंबीयांनी केलेल्या प्रवासावरून महाराष्ट्रात नुकतेच मोठे वांदग उफाळून आले. त्यावरून राज्य सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपवर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
विरोधकांनी पेटवलेल्या वेगळ्या चुलीवर वाधवान प्रकरणाचे कारस्थान शिजले नाही, असे शरसंधान शिवसेनेने केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून वाधवान प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. महाराष्ट्रात करोनासंदर्भात चांगले काम सुरू असताना वाधवान प्रकरण घडले. वाधवान कुटुंबीयांना खंडाळा ते महाबळेश्वर असा प्रवास करण्याची परवानगी राज्याच्या गृह खात्याचे प्रधान सचिव असणाऱ्या अमिताभ गुप्ता यांनी दिली.
त्या प्रवासावरून विरोधी पक्षाने वाद निर्माण केला. संबंधित अधिकारी स्वत:च्या अधिकारात प्रवासाची परवानगी देणार नाहीत. कोणीतरी त्यामागे आहे, असा संशय फडणवीस यांनी व्यक्त केला. खरेतर, फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातच गुप्ता यांची नियुक्ती झाली. त्याच अधिकाऱ्याने वाधवान कुटुंबीयांवर विशेष मेहेरबानी करून राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्या अधिकाऱ्याचा बोलविता धनी कोण याचा खुलासा होत आहे, असा शाब्दिक टोला अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी कारस्थान नक्कीच झाले. पण, शिजवलेले कारस्थान कच्चे राहिले. राज्य सरकारला वाधवान कुटुंबीयांना मदत करायची असती; तर त्यांच्या मुसक्या साताऱ्यातील सरकारी यंत्रणेने आवळल्या नसत्या. गुप्ता यांना राज्य सरकारने सक्तीच्या रजेवर पाठवले. ते भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत. त्यामुळे पुढची कारवाई केंद्र सरकारने करायला हवी. राज्यातील विरोधी पक्षाने आता केंद्र सरकारला प्रश्न विचारायला हवेत, असे म्हणत शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.