प्रवासी, व्यावासाईक वाहन विक्रीवर परिणाम
नवी दिल्ली : लॉक डाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. मार्च महिन्यामध्ये भारतात एकूण वाहन विक्री तब्बल 45 टक्क्यांनी घसरली आहे. या महिन्यात केवळ 10,50,367 एवढी वाहने विकली गेली आहेत. ही माहिती वाहन उत्पादकांची संघटना असलेल्या सिआमने दिली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये तब्बल 19,08,097 वाहनांची विक्री झाली होती. मार्च महिन्यात प्रवासी वाहन विक्रीवर तर प्रचंड परिणाम झाला आहे.
या महिन्यात प्रवासी वाहन विक्री तब्बल 51टक्क्यांनी कमी होऊन ती केवळ 1,43,014 युनिट्स एवढी झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये 2,91,861 एवढ्या प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. मार्च महिन्यात कार विक्रीत तब्बल 52 टक्क्यांची घट झाली आहे. मार्च महिन्यामध्ये केवळ 85,229 इतक्या कार विकल्या गेले आहेत.
गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये1,78,019 इतक्या कार विकल्या गेल्या होत्या.
मार्च महिन्यात दुचाकीच्या विक्रीत 40 टक्क्यांनी कमी होऊन ती केवळ 86,6849 एवढी झाली आहे. तीन चाकी वाहनांची विक्री 58 टकक्यांनी कमी झाली आहे. मार्च महिन्यामध्ये 27608 एवढ्या तीन चाकी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये 66 274 एवढ्या तीन चाकी वाहनांची विक्री झाली होती. करोना व्हायरस आणि लॉकडाऊनचा सर्वात जास्त परिणाम व्यवसायिक वाहनांच्या विक्रीवर झाला आहे. या महिन्यांमध्ये व्यावसायिक वाहनांची विक्री 88 टक्क्यांनी कमी होऊन ती केवळ 13,027 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये 109022 एवढ्या व्यवसायिक वाहनांची विक्री झाली होती.
याबाबत बोलताना सिआम या वाहन उत्पादकांच्या संघटनेचे अध्यक्ष राजन वधेरा यांनी सांगितले की, लॉक डाऊन आणि करोनाव्हायरसमुळे वाहन उत्पादकावर सर्वात जास्त परिणाम झाला असल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यामध्ये बहुतांश वाहन कंपन्यांनी आपली वाहन निर्मिती थांबविलेली आहे. त्याचबरोबर वितरकांची दुकाने हे बंद आहेत. त्यामुळे या महिन्यात वाहन विक्रीवर जास्त परिणाम होणे अपेक्षित होते. या कारणामुळे वाहन उद्योगाचे रोज 2,300 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. लॉक डाऊन जेव्हा संपेल तेव्हा काम कशा पद्धतीने सुरू करायचे याबाबत वाहन उत्पादक कंपन्या विचार करीत आहेत. वितरकांनाही या काळात वाहन कंपन्यांना मदत करावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.