नगर – जिल्हा कॉंग्रेस वतीने 1 जानेवारीपासून गाव तेथे कॉंग्रेस हे अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात जिल्ह्यात सुमारे प्रत्येक गावात कॉंग्रेसची शाखा स्थापन करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.
नगर येथे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित तालुकाध्यक्षांच्या बैठकीत आ. तांबे बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके अध्यक्षस्थानी होते. बैठकीसाठी आ. लहू कानडे, शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, जि.प. सदस्य प्रताप शेळके, ज्ञानदेव वाफारे, तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, जामखेड तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, कर्जत तालुकाध्यक्ष किरण पाटील, पारनेर तालुकाध्यक्ष संभाजी राहेकले, पाथर्डी तालुकाध्यक्ष नसीर शेख, राहुरी तालुकाध्यक्ष बाबासाहेब आढाव, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष दीपक भोसले, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, राहाता तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे, कोपरगाव तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शेवगाव तालुकाध्यक्ष अमोल फडके, प्रवीण घुले, ऍड. कैलास शेवाळे, किशोर तपकिर, पोपट खोसे आदी मान्यवर उपस्थित होते.
तांबे म्हणाले की, नगर जिल्हा कॉंग्रेसच्या विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मागील पिढीतील जिल्ह्यातील अनेकांनी या पक्षाचे नेतृत्व केले आहेत.
भाजप हे भूलथापा देऊन राजकारण करत आहे. जनतेला आता शाश्वत विकास हवा असून तो कॉंग्रेसचा विचारच करू शकतो.
कॉंग्रेसची कायम ग्रामीण भागाशी नाळ जोडली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात व जिल्ह्यात कॉंग्रेस गाव निहाय शाखा सुरू करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले. आ. कानडे म्हणाले, कॉंग्रेसच पक्ष हा एकमेव असा पक्ष आहे कि जो सर्व समाजाला एकत्रित घेऊन जाण्याचे काम करीत आहे, असे कोणते क्षेत्र नाही जिथे कॉंग्रेसनी योगदान दिले नाही.
कर्जमाफीबाबत अभिनंदनाचा ठराव
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी रुपये 2 लाखापर्यंत कर्जमाफीचा घेतलेला धाडसी निर्णय त्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच एनआरसी बाबतचा केंद्र सरकारचा निषेध करणारा ठराव यावेळी सर्वानुमते मांडण्यात आला.