“सीएए’ विरोधातील आंदोलनाबाबतची कारवाई
लखनौ : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील हिंसाचारामध्ये 19 जण ठार झाले आहेत. तर हिंसाचाराला रोखण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत 1,100 जणांना अटक करण्यात आली असून 5,558 जणांना प्रतिबंधात्मक आदेशाद्वारे ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान फिरोजाबादमध्ये पाच, मेरठमध्ये चार, कानपूरमध्ये तीन, संभल आणि बिजनौरमध्ये प्रत्येकी दोन आणि मुझफ्फरनगर, रामपूर आणि लखनौ येथे प्रत्येकी एक जण ठार झाला.
वाराणसीत 20 डिसेंबर रोजी ठार झालेल्या आठ वर्षांच्या मुलाची यामध्ये नोंद नाही. वाराणसीमध्ये मरण पावलेला 8 वर्षाचा मुलगा हा पोलिसांच्या गोळीबारात मरण पावलेला नाही, तर जमाव पळत सुटल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये त्याचा मृत्यू झाला, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
फिरोझाबादमध्ये जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
ठिकठिकाणी घातलेल्या छाप्यांमध्ये पोलिसांनी बेकायदेशीर 35 शस्त्रे जप्त केली आहेत. या शस्त्रांचा उपयोग दंगलीच्यावेळी पोलिसांवर गोळीबार करण्यासाठी केला गेला होता. राज्यातील विविध ठिकाणाहून पोलिसांनी 647 काडतुसांच्या पुंगळ्याही जप्त केली आहेत.
संभाव्य समाजकंटकांवरही पोलिसांनी कारवाई केली आणि 5,558 लोकांना प्रतिबंधक आदेशाद्वारे ताब्यात घेतले आहे. “सीएए’विरोधात झालेल्या निदर्शनांमध्ये तब्बल 351 पोलिसही जखमी झाले, असेही ते म्हणाले.
अटक करण्यात आलेल्या 11,133 जणांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, कॉंग्रेसचे कार्यकर्ते सदाफ जाफर आणि प्रख्यात नाट्य कलाकार दीपक कबीर हे देखील असून त्यांना लखनौमधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
कबीर लखनौ कलेक्टिव आणि दस्तक मंचचे संस्थापक आहेत आणि लखनौमध्ये वार्षिक कबीर महोत्सवाचे आयोजन करतात. या महोत्सवात धर्मनिरपेक्षता, समाजवाद आणि लोकशाही या मूल्यांवर विचार करण्यासाठी विविध साहित्यिक सहभागी होत असतात. तर जाफर हा एक अभिनेता आहे. तो मीरा नायरच्या आगामी “ए सुटेबल बॉय’ या मालिकेतही असणार आहे.
एका पत्रकारालाही ताब्यात घेण्यात आले होते, मात्र नंतर त्याला सोडून देण्यात आले. हिंसाचाराला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी प्रमाणापेक्षा अधिक बळाचा वापर केला, असा आरोप उत्तर प्रदेशच्या पोलिसांवर केला जात आहे.