जळोची : इन्शुरन्स क्लेम मिळवण्यासाठी चारचाकी वाहन चोरीला गेल्याची खोटी तक्रार दिल्याप्रकरणी जमालमोहम्मद अब्दुल सय्यद ( वय ४० वर्ष.रा.महादेव मळा.पाटसरोड, बारामती) यास तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, सय्यद याने दिनांक २८ जून २०२० रोजी दुपारी तीन ते चारच्या दरम्यान तांदुळवाडी गावच्या हद्दीत, तांदुळवाडी ते एअरपोर्ट रस्त्यावरून पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ कार( एम.एच ४२ ए. एच.७०७४ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तालुका पोलिसांनी गाडीचा शोध घेण्यासाठी जवळपासच्या रोडवरील सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तसेच इतर संशयित आरोपींकडे चौकशी केली असता सदर चोरीला गेलेल्या वाहनाचा सुगावा लागत नव्हता. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने उलट्या दिशेने तपास सुरू करून तांत्रिक बाबीच्या मदतीने तपास केला. त्यातून फिर्यादी हा गुन्ह्याच्या घटनास्थळी गेलाच नसल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून फिर्यादीने इन्शुरन्स क्लेमसाठी वाहन चोरीला गेल्याची खोटी तक्रार दिल्याचे व सदर वाहन शहरातील कोष्टी गल्ली येथे पार्किंग मध्ये लावल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी फिर्यादीकडे सदर प्रकरणी विचारपूस केली असता त्याने इन्शुरन्स क्लेम मिळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केल्याची कबुली दिली. याप्रकरणी सय्यद याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे.
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस हवालदार पोपट दराडे, पोलीस कॉन्स्टेबल नंदू जाधव, विनोद लोखंडे, मंगेश कांबळे यांनी केली.