सांगली : सांगलीतील मिरज तालुक्यातील भोसे गावाच्या महामार्गालगत असलेल्या ४०० वर्षे जुन्या वटवृक्षाला जीवनदान मिळाले आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याला दुजोरा दिला आहे.
रस्ता रुंदीकरण कामामध्ये हा ४०० वर्षे जुना वटवृक्ष अडथळा बनला होता. परंतु काही वृक्षप्रेमींनी याला जोरदार विरोध दर्शविला होता.
महामार्गाचे काम चालू असताना अनेक वृक्ष जमीनदोस्त करण्यात आली. त्यातच हा वटवृक्ष देखील सामील होणार होता. परंतु स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी हा वृक्ष वाचवण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरु केले त्यासाठी अनेक मोहीमा राबवण्यात आल्या. वटवृक्ष वाचविण्यासाठी करण्यात आलेले ‘चिपको आंदोलन’ देखील चांगलेच गाजले. जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई परिवाराने वटवृक्ष तसाच ठेवून त्याच्या शेजारून रस्ता करावा अशी आंदोलनादरम्यान मागणी केली होती.
आणि याचा परिणाम म्हणून सुदैवाने हायवेच्या सर्व्हिस रोडसाठी पर्याय काढून वटवृक्षाला वाचविण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला.
I’ve been informed that the NHAI has visited the 400 yr old Banyan Tree in Sangli and has begun reworking on the reallignment of the Highway, so as to save the tree.
I’m truly thankful to Union Minister @nitin_gadkari ji for positively responding to my request on this (1/2)— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2020
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभारदेखील मानले आहे.’एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी इथे भेट देऊन ४०० वर्ष जुन्या वटवृक्षाची पाहणी केली. बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.