नवी दिल्ली -तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची चर्चा आहे. मात्र, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. लहान मुलांना संसर्गाचा धोका आहे. मात्र, त्याचा परिणाम कमी असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
लहान मुलांना संसर्ग झाला, तर त्यांच्यात कोणतीही लक्षणे नसतील किंवा साधारण लक्षणे असतील. साधारणपणे लहान मुलांना रुग्णालयात भरती करण्याची गरज नसेल, असेही ते म्हणाले.
तज्ज्ञ आणि सरकारकडून तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे. त्यातच लहान मुलांसाठी टास्क फोर्स स्थापन केले जात असल्यामुळे पालकांमध्ये भयाचे वातावरण आहे. मात्र, शनिवारी याबाबत खुलासा करताना केंद्र सरकारने सांगितले की, तिसऱ्या लाटेत मुले सुरक्षित नसली तरी त्यांच्यावरील प्रभाव कमी असेल.
अनेक वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भारतात करोनाची तिसरी लाट येणे अटळ आहे. दुसरी लाट ओसरल्यानंतर साधारण सप्टेंबर महिन्याच्या आसपास भारतात करोनाची तिसरी लाट येईल, असा अंदाज आहे. ही लाट पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत मध्यम स्वरूपाची असेल.