काही काही गोष्टींमध्ये इतका बदल झालाय; परंतु पूर्वीच्या गोष्टी विसरायचं ठरवलं, तरीही विसरता येणार नाहीत…
आठवतंय मे महिन्याच्या सुट्टीत प्रवासाला म्हणजे पूर्वी आजोळी जायचं असायचं तेव्हाची आईची लगबग. आदल्या दिवशी जुने कपडे घालायचे म्हणजे ते नाही धुतले तरी चालायचे. तेव्हा बाहेरचे पदार्थ खायचे नाहीत असा जणू नियमच होता. म्हणून आई आदल्या दिवशी चिवडा-लाडू असे कोरडे पदार्थ करून ठेवी. ज्यांच्याकडे जायचं त्यांच्याकडे खाऊ घेऊन जायचं. सगळ्या पद्धती चोख पाळायच्या. सामान बांधताना अंथरुण, पांघरुण बरोबर घेऊन जायचं मग वळकटी हा पर्याय चांगला असायचा. वळकटी व्यवस्थित बांधून रेल्वे किंवा एसटीत वरच्या बाजूला ठेवून द्यायची.
हाताशी लागणाऱ्या गोष्टी वरच्या पिशवीत ठेवायच्या. त्या पिशवीचा ताबा आईकडे असायचा. गाडीत खायला, जेवायला लागतात म्हणून वर्तमानपत्राचे बेताच्या आकाराचे तुकडे घरूनच करून घ्यायचे. एक प्लॅस्टिकची पिशवी वापरलेले कागद ठेवण्यासाठी, इकडे तिकडे टाकायचे नाहीत. किती व्यवस्थितपणा!
पिण्याचे पाणी तर हवंच. त्यासाठी योग्य म्हणजे फिरकीचा तांब्या असायचा. त्यात ठेवलेलं भांड तेही घासून पुसून स्वच्छ. कारण हा तांब्या वर्षातून एकदाच वापरला जायचा. पाणी पिताना प्रत्येकाने काळजी घ्यायची, आपल्या नंतर इतरांना पाणी पुरायला हवं. प्रवास संपेपर्यंत पाणी राहायला हवं. कारण तेव्हा प्रत्येक स्टेशनवर, स्टॅंडवर आतासारख्या पाण्याच्या बाटल्या मिळत नव्हत्या.
गावाला जायचं तर बसायला जागा नीट मिळायला हवी. त्यामुळे बाबांचं काम म्हणजे रांगेत उभं राहून रिझर्व्हेशन करायचं. प्रवासाच्या दिवशी स्टेशनवर किंवा स्टॅंडवर गाडीत बसवून द्यायला यायचं. गाडी सुटेपर्यंत सूचना देत राहायचे. सामानाची काळजी घ्यायची, पोहोचल्यावर पत्र पाठवायचे अशा एक ना अनेक सूचना!
एकदा गावाला जायची तारीख नक्की झाली की, आजोळी पत्र पाठवून गाडीची वेळ, तारीख कळवून घ्यायला यायला सांगायचं. ज्यांच्याकडे जायचं त्यांना एकदा स्टॅंडवर किंवा स्टेशनवर पाहिलं की जीव भांड्यात पडायचा, पोहोचलो एकदाचं.
माहेरी वर्षातून एकदा जायचं म्हणजे देणं-घेणं आलंच. त्याची तयारी आई आधीच करून ठेवायची. आजोळीसुद्धा माहेरवाशिणीच्या स्वागताची तयारी जोरात असायची. दारात आल्या आल्या भाकर तुकडा ओवाळायचा. तिन्हीसांजेला देवापुढे, तुळशीवृंदावनात दिवा लावला जायचा आणि ओसरीवरच्या झोपाळ्यावर बसून हलके झोके घेत आजोबांच्या बरोबर म्हटलेले पाढे आणि नंतर रंगणाऱ्या गाण्यांच्या भेंड्या.
झोपाळ्याची खरं तर शानच वेगळी. हल्ली जागा कमी असते म्हणून एक माणूस बसू शकेल एवढाच छोटा झोपाळा बसवतात. पण तो लाकडी झोपाळा, त्याच्या करकर वाजणाऱ्या कड्या. मंद झोके घेत गप्पांची मैफल रंगवायची. पण आता तो आनंद क्वचित कधीतरी मिळतो. महिनाभर तिथे राहून निघताना पाऊल जड व्हायचं. पुढच्या वर्षीच्या मे महिन्याची वाट पाहात.
शहरीकरण, औद्योगिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान यामुळे आपलं आयुष्य आमूलाग्र बदललं.
हल्ली पाहुणे म्हणून कुणाकडे एक महिना काय एक आठवडाभर राहण्यास संकोच वाटतो. बहुतेक जण हॉटेलमध्ये राहून एक-दोन तास नातेवाइकांना भेटायला येतात. त्यामुळे पत्र पाठवायचा प्रश्नच येत नाही. मोबाइल फोनवरून लगेच निरोप देता येतो.
मुळात आपल्या प्रत्येकाला इतके उद्योग असतात. अगदी मुलांनासुद्धा त्यांचे क्लासेस, सुटीतली शिबिरे, पुढच्या वर्षीचा अभ्यास असे अनेक व्याप असतात. आपल्याकडे व्यक्तिस्वातंत्र्याचा थोडा अतिरेकही झालाय. त्यामुळे कुणी कुणाच्या मध्ये पडत नाही.
आजकाल प्रवासात खाण्यासाठी काही बरोबर नेणं हे पार मागे पडलयं. बस ठराविक ठिकाणी थांबते त्यामुळे प्रवासी व्यवस्थित खाऊ शकतात. आपल्याला शुद्ध पाणी लागतं आणि तशा पाण्याच्या बाटल्या जागोजागी मिळतातही. प्रत्येक जण स्वतंत्र बाटली वापरतो.
कसित तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे घरातूनच संगणकावर, मोबाइलवर बाहेरगावचे तिकीट बुक करता येते. सगळं कसं झटपट. कुटुंबाने प्रवासाला जायचं ते सुटी साजरी करायला. सगळं झटपटही आणि निवांतही. आता जरी मजा असली तरी पूर्वी जरा जास्तच मजा होती. परस्परांची जाणीव ठेवणं, सांभाळून घेणं याची खरं तर आजही आपल्याला गरज आहे.
डॉ. नीलम ताटके