शिक्षणक्षेत्र हे पवित्र क्षेत्र मानले जाते. म्हणून शाळेला ज्ञानमंदिर म्हणतात. ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीही नाही असं म्हटलं जातं. “ज्ञान ही महान शक्ती आहे,’ “ज्ञान हा तिसरा डोळा आहे,’ ही सुभाषिते वारंवार सांगितली जातात. म्हणूनच शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. माजी शिक्षण संचालक वि. वि. चिपळूणकर साहेब नेहमी म्हणायचे, “शिक्षण हे दळण नसून वळण आहे.’ तर शिक्षणाच्या उच्च परिणामाबद्दल हेलन केलर म्हणतात, “शिक्षणाचा सर्वोच्च परिणाम म्हणजे सहनशक्ती’. ज्ञानाची एक व्याख्या केली जाते, “ज्ञान म्हणजे सद्गुण.’ तर आचार्य विनोबा भावे शिक्षणाची कमीत कमी व्याख्या करतात ती म्हणजे “सत्संगती’, तर जास्तीत जास्त व्याख्या करतात “आत्मज्ञान’.
ज्ञानाबद्दल, शिक्षणाबद्दल हे सारं भरभरून सांगण्याचं कारण म्हणजे शिक्षणाचं जीवनामधलं असलेलं महत्त्वाचं स्थान! पण कधी कधी शिक्षणक्षेत्रात एखादा अनुचित प्रकार घडतो आणि लोकांना धक्का बसतो. समाजमन दुखावले जाते. जिथं ज्ञान दिलं जातं, संस्कार केले जातात, जीवनाची जडणघडण होते, तेथे असे घडावे हे लोकांना पटत नाही. कधीतरी वर्तमानपत्रात छापून येते, “शिक्षक भरतीमध्ये भ्रष्टाचार’, “शिक्षकांचे अश्लिल चाळे’, “वार्षिक सर्वसाधारण सभेत शिक्षकांमध्ये हाणामारी.’ “सेवाज्येष्ठतेवरून वादावादी, शिक्षकांची एकमेकांविरुद्ध पोलीस चौकीत तक्रार.’
अशा बातम्या ऐकल्यावर, वाचल्यावर पालकांमध्ये खिन्नता येते. त्यांना त्यांच्या पाल्याच्या भवितव्याची चिंता वाटते आणि त्यात चुकीचे काहीच नाही. अलीकडे एका प्राध्यापक मित्राने त्यांच्या महाविद्यालयात घडलेली घटना सांगितली आणि मन उदास झाले. कारण मीही शिक्षणक्षेत्रात पस्तीस वर्षे अध्यापन केले आहे. मित्राने सांगितलेली बातमी अशी. त्यांच्या महाविद्यालयात सेवाज्येष्ठतेने एका प्राध्यापकाची “प्राचार्य’ पदावर नेमणूक झाली. मात्र, त्या पदावर विराजमान झाल्यावर महाविद्यालयात नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवणे, विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे, त्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणे हे न करता सहकारी प्राध्यापकांचा बदला कसा घेता येईल असे प्रयत्न सुरू केले.
एकेदिवशी या प्राचार्य महाशयांनी स्वतःच्या केबिनमध्ये बसून, स्क्रीनवर कोणत्या वर्गावर शिक्षक गेले नाहीत हे पाहिले आणि त्यांना जे हवे होते ते सापडले. ते एका वर्गावर गेले. तेथे संबंधित प्राध्यापिका वर्गावर आल्या नव्हत्या. त्यांनी मुलांना खडसावून विचारले, “”तास कुणाचा आहे रे?” मुलांनी संबंधित प्राध्यापिकेचे नाव सांगितले. प्राचार्यांना तेच हवे होते. ते कडाडले, “”प्रत्येकाने वहीचा एक कागद काढा आणि त्यावर बाई वेळेवर वर्गात आल्या नाहीत, म्हणून आमचे शैक्षणिक नुकसान झाले असे लिहा. त्याखाली स्वतःची स्वाक्षरी करून तारीख टाका.” विद्यार्थ्यांनी प्राचार्यांची सूचना शिरोधार्थ मानून कागदावर तसे लिहून दिले. सर्व विद्यार्थ्यांचे तक्रार अर्ज गोळा करून प्राचार्य त्यांच्या केबिनमध्ये निघून गेले. त्यानंतर प्राध्यापिकाबाई वर्गावर आल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. मनातल्या मनात त्या पुटपुटल्या, “यांना त्या पदावर बसून माझा सूड घ्यायचा आहे तर!’
त्यानंतर पाच दिवसांनी त्या स्थानिक पोलीस चौकीत गेल्या आणि संबंधित प्राचार्यांच्या नावाने विनयभंग केल्याची तक्रार केली. मग पोलीस चौकीतून महाविद्यालयात प्राचार्यांना फोन गेला. “”तुमच्याविरुद्ध विनयभंगाची लेखी तक्रार आली आहे. अर्ध्या तासात पोलीस चौकीत हजर व्हा. नाहीतर तेथे येऊन तुम्हाला अटक करावी लागेल.” पोलिसांचा फोन आल्यावर प्राचार्य गडबडले. त्यांना दरदरून घाम फुटला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ते तडक आमदार साहेबांच्या बंगल्यावर गेले. त्यांनी आमदारसाहेबांना सारा वृत्तांत कथन केला. मग आमदार साहेबांनी पोलीस चौकीला फोन करून प्राचार्यांना अटक न करण्याचे फर्मान सोडले. वर असेही सांगितले की, “”प्राचार्य त्यांच्या सोयीने येऊन त्यांचे लेखी म्हणणे देतील.” त्यामुळे प्राचार्यांची अटक टळली. मात्र, काही दिवसांनी वृत्तपत्राच्या स्थानिक पुरवणीत ती बातमी झळकलीच. शिक्षणक्षेत्रात असे घडू नये असे आपल्याला वाटते; पण अधूनमधून असे काहीतरी घडते आणि समाजात खळबळ उडते. अशा घटना घडण्याचे कारण म्हणजे वरिष्ठ पद मिळविण्याची स्पर्धा किंवा इर्ष्या. तसेच कर्तव्याचे विस्मरण, सूड घेण्याची भावना, सहकारी शिक्षकांबद्दलचा द्वेष किंवा मत्सर, ही त्यापैकी काही कारणे होत.
यावरचा उपाय म्हणजे शिक्षकाने अध्ययन-अध्यापनात रमले पाहिजे. त्यांनी अफाट वाचन केले पाहिजे. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची काळजी वाहिली पाहिजे. शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग केले पाहिजेत. अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले पाहिजेत. म्हणजे मग नको त्या गोष्टीत मन रेंगाळणार नाही. आचार्य विनोबांच्या भाषेत सांगायचे तर “शिक्षक हा विद्यार्थीपरायण (तल्लीन) असावा, विद्यार्थी हा शिक्षकपरायण असावा, दोघेही ज्ञानपरायण असावेत आणि ज्ञान हे सेवापरायण असावे.’ अशा मार्मिक शब्दांत आचार्यांनी शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आहे. मग त्यापेक्षा वेगळं मी काय सांगणार? आचार्यांच्या विचारांना दुजोरा देत मी फक्त “मम’ म्हणतो.
डॉ. दिलीप गरूड