“एकाच या जन्मी जणू
फिरूनी नवी जन्मेन मी’
मराठी रसिकांचे आवडते गीतकार सुधीर मोघे यांच्या गाण्यामधल्या या दोन ओळी जणू आशावादाचं मूर्तीमंत प्रतीकच आहेत. त्यामुळंच हिंदू संस्कृती खूप उच्च दर्जाची मानावी लागते. आमच्याकडं शरीराचं मरण असलं तरी आत्म्याला कधी मरण नसतं. इच्छा राहिल्या तर त्या पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म होतो पण भूत किंवा पिशाच्च होत नाही. इच्छा पूर्णत्वास गेल्यावर तो जीन मुक्त होतो. निराशा, चिंता, काळजी असा शब्द किंवा विचारच आपल्याकडे नाही.
जो काही असतो तो फक्त नवा अध्याय असतो. ग्रंथ संपत नाही, संपूच शकत नाही. ग्रंथाची पारायणं होतात. लोक ती मनोभावे करतात. (भले अर्थ न कळेना का!) कधी ना कधी तरी अर्थ कळेल, नुसता कळेल नव्हे तर तो प्रत्यक्ष आचरणात येईल अशी आशा असते.
अध्यायांना नेहमीच अनुक्रम असतो आणि संख्या तर कधीच संपत नाहीत. एक संख्या उचारताच त्यापुढची ओठांवर येतेच. भले मग ती एक लाख कोटी एवढी प्रचंड संख्या असली तरी त्यापुढची संख्या असतेच.आणि नवा अध्याय सुरू होण्यासाठी “रामायण’च घडावं लागतं असं काही नाही. साध्या सरळ सुलभ आयुष्यातही नेहमीच नव्या अध्यायाची सुरुवात होत असते.
निसर्ग माणसाला सतत, दरक्षणी संधी देत असतो. दर नवाक्षण ताजातवाना, उत्फुल्ल, टवटवीत असतो.
क्षण नवीन सुंदर
क्षणालाही तेच कळे
क्षण क्षण जगताना
त्याला नवा अर्थ मिळे
क्षण, दिवस, वर्ष, दशक (युग वगैरे नको कारण ते काही आपल्या आयुष्यात येत नाही) आपण सारे नव्या वर्षाचा संकल्प करतो. रोज व्यायाम, लवकर उठणे, न रागावणे वगैरे पण हजारो लोकांचा तो तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी मोडतो. पहिल्या दिवशी उत्साहात पार पडतो. दुसऱ्या दिवशी रडत कढत होतो, तर तिसऱ्या दिवशी विसरला जातो किंवा “उद्या’वर ढकलला जातो.
आपली बदलण्याची तयारी असेल तर नवा अध्याय कधीही सुरू होऊ शकतो. तो मैत्रीचा असेल, नात्यांचा असेल, निवडणुकीनंतरचा, नैराश्यानंतरचा, विजयानंतरचा अक्षरशः कोणाचाही, कुठल्याही क्षेत्रातला! (अगदी कॉलेज संपल्यानंतर नोकरीची शोधाशोध, ती लागल्यावर बायकोची, घराची) हजारो, लाखो, कोट्यवधी ग्रंथ आणि त्याचे कोट्यवधी किंवा अब्जावधी अध्याय.
पण प्रत्येक अध्यायच केवळ मनोरंजन नव्हे तर रहस्यपूर्ण, वैविध्यपूर्ण, साहसाला, धैर्याला आमंत्रण देणारा असतो. ज्याच्या आयुष्यात तो घडतो त्याच्यासाठी तर महत्त्वाचाच असतो. पण नातेवाईक, मित्रमंडळी शत्रू (आणि फक्त करमणुकीसाठी बघणारे लोकही) तसं नेहमीच आपणही नाही का रस्त्यावरची भांडणं मजेत बघत. (किंवा काहीजण अपघात घडल्यावर जखमींना मदत न करता त्यांचा “सेल्फी’ काढत) मेणबत्ती संपून गेल्यावर मेण वेड्यावाकड्या रूपात पसरून राहातं आणि ज्योत कुठंतरी जाते. पण ऊर्जा कधीच नष्ट होत नाही असं विज्ञानच म्हणतं ना? मग सगळंच कसं संपेल? फक्त नवा अध्याय सुरू होतो, मन उल्हासित करतो- आनंदानं, उत्साहानं आपण परत वाचन पुढं सुरू करतो. नवे नवे अध्याय येत राहतात, वाचन सुरू राहतं… आयुष्य पुढं सरकतं…
सहजानंद