नगर – पहाटे पाच वाजता व रात्री साडेआठ वाजता जून्या महापालिका इमारतीवरून वाजणारा भोंगा नगरकरांना दिवस सुरू झाल्याची आणि व्यावसायिक कामकाज संपण्याची जाणीव करून द्यायचा. मात्र हा भोंगा गेल्या दहा वर्षांपासून बंद होता. तो सुरू करण्याचा अट्टहास स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांनी केला. 1 मे महाराष्ट्र दिनी नगरकरांना पुन्हा भोंग्याचा आवाज येणार असे त्यांनी जाहीर केले. परंतू 1 मे जाऊन आता दोन महिने होत असले तरी नगरकरांना या भोंग्याचा आवाज काही कानावर पडला नाही.
रंगीत तालीमध्ये भोंग्याचा आवाज आला पण त्यानंतर हा आवाज बंद झाला. काय म्हणे जुन्या महापालिकेच्या इमारतीला आवाज सहन होणार नाही. त्यामुळे ही इमारत पडेल. म्हणून शेजारच्या संत कैकाडी महाराज संकुलात भोंगा बसविण्यात येणार आहे. त्यानंतर हा भोंगा वाजणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भोंग्याच्या आवाजावर नगरकरांच्या दैनंदिन कामाची सुरुवात होत असे. पहाटे व रात्री भोंगा वाजण्याचा उद्देश तत्कालीन गुमस्ता (व्यापारी) कायद्याशी निगडीत आहे.
त्यानुसार रात्री 8.30 वाजता भोंगा वाजला की, बाजारपेठेतील व्यापारी आपली दुकाने बंद करीत असत. त्या काळामध्ये शहरामध्ये एखाद्या ठिकाणी आग लागल्यास हा भोंगा वाजवून नागरिकांना सूचना दिल्या जात असत. तसेच पहाटे 5 वाजता भोंगा नागरिकांची दिनचर्या सकाळी लवकर सुरु होण्यासाठी असे तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे दिवशी 30 जानेवारीला आदरांजली वाहण्यासाठी सकाळी 11 वाजता नागरिकांनी 2 मिनिटे स्तब्ध उभे राहण्याबाबत सूचित करण्याकरीता या भोंग्याचा उपयोग होत असे.
1 मे 2013 रोजी मनपाच्या जुन्या इमारतीतील कौन्सिल हॉलला आग लागली व त्यात भोंग्याचे सूरही जळून गेले. महाराष्ट्र दिनी भोंगा पहाटे पाच वाजता सुरु झाला पण फक्त 4 दिवस त्याचा आवाज आला. नंतर तो बंद पडला. जुन्या इमारतीवरून हा भोंगा काढून जुन्या मनपासमोरील संत कैकाडी महाराज संकुलाच्या टेरेसवर ठेवला. सध्या त्याची उंची पाचफूट आहे, काही काळात 15 फुटापर्यंत वाढवली जाणार आहे. अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही.
जुन्या मनपा परिसरात दुकान आहे. पूर्वी रात्री भोंगा झाला म्हणजे दुकान बंद करायचं असे समजले जायचे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भोंग्याचा आवाज आम्ही विसरून गेलो आहोत, असे व्यावसायिक रिझान शेख म्हणाले.
पहाटे भोंगा वाजत असे त्यावेळी आम्हला जाग यायची व त्यावेळी पाणी येत असे पण आता भोंगा वाजत नाही. त्यामुळे पाण्याच्या वेळेत जागही येत नाही. मनपाने हा भोंगा पुन्हा सुरु करावा, असे गृहिणी राणी कोलम म्हणाल्या.