नगर -सध्या शहरासह जिल्ह्यात वाहनांचा पाठलाग करून व्यापारी व नागरिकांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून चोरीचा प्रकारच्या घटनांत वाढ होतांना दिसत आहे. तसेच महिलांचे मंगळसूत्र चोरी, चैन स्नॅचिंगच्या घटना घडत आहे. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकामधून होत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले आडते बाजार, दाळमंडई, एम.जी. रोड व त्या लगतचा सर्व परिसर या भागात दिवसेंदिवस चोर्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. काही दिवसापूर्वी प्रताप हर्दवाणी यांना मारहान करून त्यांच्याकडील पैश्याची बॅग हिसकावून घेऊन काही चोरटे पळून गेले. त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
तसेच दीपक आहुजा यांच्या बाबतीत अशीच घटना डाळमंडई परिसरात घडली होती. मात्र यातील आरोपी अद्यापही मोकाट फिरत आहेत. पोलिसांची गुन्हेगारांमध्ये भीती राहिली नसल्याचे दिसत आहे. तसेच गुन्हा घडल्यानंतर तक्रार देण्यास नागरिक पोलीस ठाण्यात जातात. पण हद्दीचा विषय समोर येतो व त्यातच नागरिकांचा वेळ जात असल्याने पोलीस प्रशासनाने उपाय योजना कराव्यात अशी मागणी ही होत आहे.
चोरीच्या घटनेबाबत अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरात रात्री 11 नंतर फिरणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. याचबरोबर वाहनांना नंबर प्लेट नसणारे, गाडीची कागदपत्रे नसणारे, वाहतुकीचे नियम मोडणारे, तसेच रस्त्यांवर टोळक्याने जमा होत वाढदिवस साजरे करणार्यांवर कारवाई केली जाणार असून याबाबत शहरात ठिकठिकाणी नाकेबंदी केली जाणार आहे. चोरट्यांवर आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल.
प्रशांत खैरे, , अप्पर पोलीस अधीक्षक, नगर
अन्यथा दाळमंडईत करणार उपोषण : आ. जगताप
शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे. पोलीस तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे. या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी अन्यथा मंगळवार (दि.28) रोजी दाळमंडईत उपोषण करू असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी पोलीस प्रशासनाला दिला.