– हेमंत महाजन
मणिपूरमधील हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी सैनिकी नेतृत्वाची गरज आहे, जे आपल्या सैनिकांबरोबर धोकादायक ठिकाणी जाऊन आपल्या सैनिकांचं नेतृत्व करतील आणि बिकट परिस्थितीवर मात करतील.
मणिपूरमध्ये गेल्या 6 आठवड्यांपासून हिंसाचार सुरू आहे. रोज घरे जाळली जातात, रस्ते बंद केले जातात, एक जमात दुसऱ्या जमातीवर हल्ले करत आहे. परवा एक घटना घडली, ज्यामध्ये मणिपूरमधले रिटायर्ड लेफ्टनंट जनरल एल. एन. सिंग यांनी सोशल मीडियावर ट्विट केले की, “मणिपूरची परिस्थिती हिंसाचारामुळे सीरिया, लिबिया किंवा अफगाणिस्तानसारखी झाली आहे. कोणीही कोणालाही मारतो आहे. मी एक रिटायर सैनिकी अधिकारी आहे, इथे जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती मी माझ्या आयुष्यात कधीही बघितलेली नव्हती. मणिपूरमध्ये फक्त जंगल राज काम करत आहे. आमच्या वेदना कोणी समजू शकेल का?’
जनरल एल. एन. सिंग हे भारतीय सैन्याच्या मिलिटरी इंटेलिजन्समध्ये 40 वर्षांहून अधिक काळ कार्यरत होते. ते भारतीय सैन्याच्या पुण्यामध्ये असलेल्या इंटेलिजन्स स्कूलचे कमांडन्ट होते. म्हणजे गुप्तहेर माहिती कशी काढायची, त्याची त्यांना चांगली माहिती आहे. त्यामुळे मणिपूरमध्ये सध्या नेमके काय चालले आहे हे त्यांना चांगले माहीत असावे. ते मणिपूरमध्ये राहात आहेत. अजून दुसरे लेफ्टनंट जनरल के. एच. सिंग यांनीसुद्धा परिस्थिती अतिशय गंभीर आहे, यावर भाष्य करून उपाय सुचवले आहेत. तेसुद्धा मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये राहतात. त्यांची पत्नी महाराष्ट्रीय आहे.
अराजकता, हिंसाचार थांबवणे मणिपूरमधील अराजकता, हिंसाचार थांबवणे गरजेचे आहे. देशाची एकच संस्था ही परिस्थिती पूर्वपदावर आणू शकते, ती म्हणजे भारतीय सैन्य. कारण अनेक पोलीस आपल्या जाती-जमातीप्रमाणे आपापल्या समूहांना मदत करताना/त्यांच्याबरोबर हिंसाचार करताना पकडले गेले आहेत. पोलीस नेतृत्व कंट्रोल रूमच्या बाहेर जायला तयार नाही. धोकादायक परिस्थितीमध्ये पोलिसांचे नेतृत्व एखादा कनिष्ठ दर्जाचा पोलीस करत आहे. चार मे नंतर भारतीय सैन्याच्या दोन डिव्हिजन्स आणि आसाम रायफल मणिपूरमध्ये तैनात करण्यात आले. आसाम रायफल हे एक पॅरामिलिटरी फोर्स दल आहे, मात्र याचे अधिकारी फक्त भारतीय सैन्यामधले असतात. त्यामुळे या दोन दलांमध्ये चांगले को-ऑर्डिनेशन असते. आज तिथे सैन्याचे आणि आसाम रायफलचे मिळून 148 कॉलम्स आहेत. एक कॉलम एका कंपनीच्या ताकदीचा असतो. ऐंशी ते शंभर सैनिक दोन किंवा तीन ऑफिसर्सच्या नेतृत्वाखाली कॉलममध्ये काम करतात.
मणिपूरमध्ये झालेल्या सिझफायर करारामुळे शरणागती पत्करलेल्या अनेक बंडखोर गटांना त्यांच्या शस्त्रांबरोबर कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. तिथून अनेक शस्त्र गायब झाली आहेत. त्यामुळे हिंसाचार करणाऱ्यांकडे शस्त्र आणि दारूगोळा यांचा मोठा साठा आहे. कुकी आणि मैतेई जमातीमध्ये एकमेकांविषयी एवढा द्वेष आहे की ते रोज एकमेकांवरती हल्ले करून हिंसाचार वाढवत आहे. मणिपुरी युवक स्वभावत: आक्रमक असतात. ते चांगले सैनिक बनू शकतात; परंतु सध्या त्यांची शक्ती एकमेकांविरोधात लढण्यासाठी खर्च केली जात आहे. हिंसाचारामध्ये अनेक महिलासुद्धा सामील आहेत. या महिला गटांनी आणि अनेक संघटनांनी आसाम रायफलच्या कंपनी बेसेसना अनेक ठिकाणी वेढा घातला आहे, ज्यामुळे आसाम रायफलच्या सैनिकांना आपल्या कॅम्पच्या बाहेर येणे कठीण होते.
भारतीय सैन्याचे उत्कृष्ट काम
अशा कठीण परिस्थितीवर मात करून आसाम रायफल आणि भारतीय सैन्य मात्र तिथे दिवस-रात्र काम करून अनेकांना वाचवत आहे, अनेक शस्त्रे पकडत आहे आणि अनेक हिंसाचार करणाऱ्यांना पकडत आहे. रोजच सैन्याची तिथे वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स सुरू आहेत. सैन्याने आतापर्यंत 40 हजारांहून जास्त नागरिकांना हिंसाचारापासून वाचवले आहे, अनेकांना गाडीच्या मदतीने, हेलिकॉप्टरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले आहे. ज्या वेळेला हिंसाचार करणारा गट एखाद्या गावामध्ये येतो, तिथे सैन्य जाऊन त्याच्या विरुद्ध लगेच कारवाई करते, यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत.
डोंगराळ भागांमध्ये लोक एका मोठ्या गावात राहत नाही. ते वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहतात. कुठे 50 ते 60 घरे किंवा कुठे 100 ते 120 घरे एवढीच असतात. लांब पसरलेल्या डोंगराच्या विविध भागांमध्ये राहणाऱ्या जनतेला 148 कॉलम पुरेसे नाही. तिथे असलेल्या सैन्याच्या कॉलमची संख्या दुप्पट करावी लागेल.अनेक राजकीय पक्ष, संस्था सल्ले देण्यामध्ये पुढे आहेत. त्यांना मणिपूरमध्ये स्थापन झालेल्या पिस कमिटीमध्ये पाठवले जावे आणि हिंसाग्रस्त भागामध्ये हातात शस्त्रे असलेल्या युवकांशी संवाद साधायला भाग पाडायला पाहिजे.
काय करावे?
सध्या मणिपूर जनता प्रत्येक गाव किंवा वस्ती आमच्याजवळ सैन्याला तैनात करावे असे म्हणत आहे. सैन्य ज्यावेळेला शोधमोहिमेला जाते त्यांच्याबरोबर कायदा सुव्यवस्थेवरती लक्ष ठेवण्याकरता सीआरपीएफची एक तुकडीपण बरोबर असते. जसे कश्मीरमध्ये केले जाते तसेच मणिपूरमध्ये व्हावे. 80 च्या दशकामध्ये मिझोराममध्ये हिंसाचार वाढला. त्यावेळेला सैन्याचे अधिकारी जनरल सगत सिंग यांनी परिस्थिती काबूमध्ये आणली. यावेळेससुद्धा सैन्याच्या दिमापूर स्थित 3 कोरच्या नेतृत्वाखाली सगळ्या सुरक्षा दलांना आणले जावे आणि सुरक्षा दलांचा वापर कसा केला पाहिजे हे 3 कोरने ठरवावे. पुढचे काही दिवस मणिपूरमध्ये सैन्य वाढवून सीमा सुरक्षित केल्या पाहिजे, ज्यामुळे नवीन शस्त्रे, दारूगोळा मणिपूरमध्ये येणार नाही. हिंसाग्रस्त भागांमध्ये शोधमोहीम राबवून लुटलेली सगळी शस्त्रे परत मिळवली पाहिजे.