पुणे – मागील पंधरा दिवसांपासून घाऊक आणि किरकोळ बाजारात सातत्याने कांद्याचे भाव वाढत होते. मात्र, कांदा निर्यातीवर सरकारने 40 टक्के शुल्क आकारले आहे. त्यामुळे सोमवारी (दि.21) घाऊक बाजारातील किलोच्या भावात 2 रुपयांनी घट झाली. आवक अशीच वाढत राहिल्यास भाव आणखी घटण्याचा अंदाज व्यापारी वर्तवत आहेत. मात्र, निर्यात शुल्कामुळे खरेदीदार आणि शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.
मागील दोन दिवसांपर्यंत घाऊक बाजारात किलोचा भाव 25 रुपयापर्यंत गेला होता. तर, किरकोळ बाजारात किलोचा भाव 40 रुपयांवर गेला होता. मात्र भावात घट झाल्याने मार्केटयार्ड घाऊक बाजारात प्रतिकिलो 18 ते 23 रुपये भाव मिळाला. निर्यात शुल्कामुळे निर्यातदारांनी कांदा खरेदी थांबविली आहे. निर्यातही थांबली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक वाढत आहे. परिणामी भावातही घट होत आहे. सध्या मार्केटयार्डातील घाऊक बाजारात 40 ट्रक कांद्याची आवक झाली. ही आवक पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, खेड तसेच नगर, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून झाली.
“घाऊक बाजारात कांद्याची भाववाढ सुरू होती. मात्र, सरकारने कांदा निर्यातीवर शुल्क लावले. त्यामुळे कांदा निर्यातीचा खर्च वाढला आहे. निर्यातदारांनी निर्यात थांबविली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात भावात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे. कांद्याच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत.” – विलास भुजबळ, ज्येष्ठ आडते, मार्केटयार्ड.