प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 15 -शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेल्या खडकवासला धरणामध्ये सांडपाणी मिसळू नये, यासाठी धरणाच्या दोन्ही बाजूस धरणाच्या भिंतीपासून बॅक वॉटरपर्यंत सुमारे 12 ते 15 किलोमीटर अंतरापर्यंत सांडपाणी वाहिन्या टाकाव्यात. या वाहिन्यांमध्ये गावातून येणारे पाणी सोडून धरणाच्या पुढील बाजूस सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा आराखडा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत आहे. यामुळे धरणात सांडपाणी येणार नाही व धरणातील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होईल.
खडकवासला धरणाच्या वरील गावांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात रिसोर्टमध्ये निर्माण होणारे सांडपाणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी एप्रिल महिन्यात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यात बैठक झाली होती. या बैठकीस जलसंपदा, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, महापालिका तसेच या गावातील सरपंच उपस्थित होते. या बैठकीमध्ये पवार यांनी भीमा, मुळा-मुठा आणि नीरा खोऱ्यातील सर्व गावात निर्माण होणारे सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीचा आराखडा तयार करून सादर करावा, अशा सूचना दिल्या होत्या. जेणे करून या खोऱ्यातील गावांमध्ये निर्माण होणारे सांडपाणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणार नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितले होते.
खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वस्ती वाढत आहे. त्यामुळे जलप्रदुषणाचे प्रमाणही वाढू लागले आहे. ते रोखण्यासाठी आणि धरणाच्या परिसराचा विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरत तो पूर्ण करून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
-ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग
आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात
खडकवासला परिसराचे सुशोभीकरण करण्याबरोबरच वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम जलसंपदा विभागाने सुरू केले असून, ते अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामध्ये धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस 12 ते 15 किलोमीटर अंतरापर्यंत सांडपाणी वाहिन्यांचे जाळे निर्माण करणे, त्या सांडपाणी वाहिन्यांच्या माध्यमातून सांडपाणी गोळा करून धरणाच्या पुढील बाजूस सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून त्यावर प्रक्रिया करणे आणि प्रक्रिया केलेले पाणी नदीपात्रात सोडणे, अशी योजना आहे. त्याचबरोबरच धरणाच्या दोन्ही काठांच्या भागाचे सुशोभीकरण करणे, बायोडायर्व्हसिटीचे जतन करण्यासाठी अन्य उपाययोजना देखील या आराखड्यात प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.