शिरूर तालुक्यातील बेटचा शेतकरी हताश : भरपाई निधी अडकला लालफितीत
प्रफुल्ल बोंबे
जांबूत- शिरूर तालुक्यातील बेट भागातील पिंपरखेड, काठापूर खुर्द, जांबूत परिसरात महिन्यांपूर्वी झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यावेळी महसूल प्रशासनाने नुकसान भरपाईचे पंचनामे केल्यानंतर अद्याप भरपाईची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने शेतकरी संतापला आहे. शासन निर्णय लालफितीत अडकल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
शिरूर तालुक्यातील बेट भागात महिन्यापूर्वी ढगफुटीसदृश पावसाने शेतकरी बाधित झाले होते. कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आलेले होते. परंतु हे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच वाहून गेलेले शेतींचे बांध, रस्त्यांचे भरावे यावर तात्काळ मुरुमीकरण करावे, अशा सूचना माजी गृहमंत्री गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, शिवसेना नेते अविनाश रहाणे, भीमाशंकरचे संचालक प्रदीप वळसे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजाराम बाणखेले, गणेश जामदार आदी लोकप्रतिनिधींकडून प्रशासनाला दिल्या होत्या.
त्यानंतर गेल्या आठ दिवसांत देखील अतिमुसळधार पावसाने पुन्हा झोडपून काढले. यामध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन एक महिना उलटूनही अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नवीन पिकांचे भांडवल उभे करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. हे पंचनामे केवळ कागदावरच राहिले असून लोकप्रतिनिधींच्या सूचना मात्र हवेत विरल्या काय, असा संतप्त सवाल बाधित शेतकऱ्यांमधून होत आहे. नुकसानीची भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे.
यंदा अनेक ठिकाणी ढगफुटी व अतिमुसळधार झालेल्या पावसाने कोबी, फ्लॉवर, झेंडू, टोमॅटो, सोयाबीन, मिरचीसह तरकारी पिकांचे नुकसान झाले आहे. यातच कांद्याच्या पडलेल्या बाजारभावाने भांडवली खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहनापर 50 हजार रुपये कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र, खात्यावर पैसे कधी जमा होणार? याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जाण्याची शक्यता आहे.
एक महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले आहे. पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. याबाबतीत माहिती घेऊन लवकरच कळविण्यात येईल. मागील वर्षी झालेल्या वादळी पावसात बेट भागातील पिंपरखेड, चांडोह, फाकटे आदी गावांत थंडीने मृत्यू झालेल्या मेंढ्यांची नुकसानभरपाई आलेली आहे. लवकरच संबंधित भरपाईचा निधी मेंढपाळांच्या खात्यावर ती वर्ग करण्यात येईल.
-अमोल ठिगळे, तलाठी.