पुणे -महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना इयत्ता पाचवी व आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा 23 मे रोजीच घेण्याचा अट्टहास कायम ठेवला आहे. परीक्षेच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरू ठेवली आहे.
या परीक्षेला सुमारे 6 लाख 30 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. दरवर्षी इयत्ता पाचवीसाठी 16 हजार 693, तर आठवीसाठी 16 हजार 588 विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत दरमहा शिष्यवृत्ती देण्यात येते. दरवर्षी ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्यात येते. मात्र, यंदा करोनामुळे 25 एप्रिल रोजी घेण्याचे निश्चित केले. मात्र, नंतर परीक्षा पुढे ढकलत 23 मे रोजी घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, दहावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर शिष्यवृत्तीची परीक्षाही रद्द होण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पत्र पाठविले आहे.
राज्यभरातील विद्यार्थी, पालक, मार्गदर्शक शिक्षकांकडून परीक्षेबाबत परीक्षा परिषदेकडे फोन व ई-मेलद्वारे विचारणा होत आहे. शासनाच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात यावी, परीक्षा रद्द करू नये असा सूर या सर्वांकडून उमटत आहे. याबाबींचा विचार करून परीक्षा परिषदेकडून परीक्षा आयोजनाची तयारी केली आहे. करोनाच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन परीक्षा नियोजित वेळी घेता येईल. परिस्थिती जर प्रतिकूल असेल तर रद्द करण्याऐवजी काही काळासाठी परीक्षा पुढे ढकलणे सूचित ठरणार आहे, असे सुपे यांनी पत्रात नमूद केले आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा शिष्यवृत्ती परीक्षेवर बहिष्कार
इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; अन्यथा या परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने दिला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेलाही याविषयी निवेदन दिल्यानंतर परीक्षा परिषदेने हा विषय शासनाकडे टोलवला असून, शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. देशपातळीवरील प्रमुख परीक्षा पुढे ढकलेल्या असतानाही, तसेच विद्यापीठाच्या परीक्षाही ऑनलाइन होत असताना शिष्यवृती परीक्षा ऑफलाइन घेण्याचा हट्ट का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
करोना काळात ऑफलाइन परीक्षा घेणे, खरंच आवश्यक आहे का? केंद्र शासनाने कोणत्याही परीक्षा या काळात घेण्यात येऊ नयेत, असे निर्देश दिलेले असतानाही परीक्षा परिषदेने परीक्षा होणार असल्याचे नियोजन पत्र काढणे म्हणजे हा मुद्दाम केलेला हट्टवादच आहे, असेच म्हणावे लागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रातांध्यक्ष वेणूनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, राज्य कोशाध्यक्ष किरण भावठाणकार, संघटनमंत्री भगवान साळुंखे, कार्याध्यक्ष नागो गाणार, महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, सुनील पंडित, शिक्षक संदेश प्रमुख उल्हास वडोदकर यांनी पत्रात केले.