पुणे – तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेसाठी परीक्षा अर्ज स्वीकृती सुरू आहे. मात्र, शैक्षणिक शुल्काच्या कारणावरून काही संस्था विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरून घेण्यामध्ये अडचणी निर्माण करीत आहेत. त्या पार्श्वभूमीर तंत्रशिक्षण मंडळाने सर्व तंत्रशिक्षणच्या शैक्षणिक संस्थांना कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
सध्या तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षेसाठी 3 मेपासून परीक्षा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक शुल्क भरले नाहीत, अशा विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज न भरून घेतल्यास विद्यार्थ्यांचे दीर्घकालीन शैक्षणिक नुकसान होऊ शकते, याकडे तंत्रशिक्षण मंडळाने लक्ष वेधले आहे.
त्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्थेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षा 2021चे अर्ज मुदतीत भरून घेतले जातील याची खरबदारी संस्था प्रमुखांनी घ्यावी. तसेच एकही पात्र विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संस्था प्रमुख म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार राहाल, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी दिल्या.