पाणी फाउंडेशनच्या कामाचा जावळीत श्रीगणेशा
सातारा – जिथं पिकत तिथं विकलं जात नाही असं म्हणतात तसंच चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं. जावळी तालुका हा नैसर्गिक विविधतेने नटलेला तालुका आहे. काही ठिकाणी मुबलक पाणी असल्यामुळं पाण्याचं महत्त्व कोणाला समजत नाही तर याउलट काही ठिकाणी पाणी प्यायला सुद्धा मिळत नाही अशी अवस्था आहे. भविष्यात भासणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन आत्ताच पाणी वाचविण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज आहे. अन्यथा मानवाचे भविष्य हे पेट्रोल प्रमाणे पाणी खरेदी करताना पाहायला मिळेल. कडक उन्हाळा, जंगलाची बेसुमार तोड आणि भीषण पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी फाऊंडेशन टीम जावळी यांच्या माध्यमातून कुसूंबी परिसरातील डोंगरात असणारे झरे पुनर्जीवित करण्यात आले.
कुसूंबितील डोंगरात काही ठिकाणी पाण्याचे झरे आहेत मात्र त्यात गाळ साचून ते झरे नष्ट झाले आहेत त्यामुळे त्यातला गाळ काढण्याची गरज आहे. मागील वर्षी कुसूंबितील युवकांनी पुढाकार घेऊन काही ठिकाणी झरे पुनर्जीवित केले होते त्याचा उपयोग होऊन आजच्या कडक उन्हात सुद्धा त्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पुरेल इतका पाणीसाठा तिथे उपलब्ध आहे. हाच आदर्श घेऊन पाणी फाऊंडेशन टीम जावळी यांनी आज कुसूंबी येथे नष्ट होत चाललेल्या झऱ्यांतील गाळ काढून झरे पुनर्जीवित केले तसेच सिमेंटचा वापर करून ते पाणी पाईपद्वारे कुसूंबी गावातील शाळेजवळील हौदात आणून सोडले. या कामगिरीमुळे गावात असणाऱ्या शाळेला पाणीटंचाई जाणवत होती ती कायमस्वरूपी मिटेल अशी आशा यावेळी या युवकांनी व्यक्त केली. पाणी आडवा पाणी जिरवा पाणी वाचून देशाचं भविष्य वाचवा हा संदेश देत आज पाणी फाऊंडेशन टीम जावळी ने एका नवीन उपक्रमाचा श्रीगणेशा केला.