कुरकुंभ (प्रतिनिधी) – जागतिक पटलावर ठळकपणे अधोरेखित झालेल्या कुरकुंभ (ता. दौंड) येथील औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सलेट प्रा. लि कंपनीत शनिवारी (दि.2) सॉल्व्हंटमिश्रित केमिकलला आग लागून स्फोट झाल्याने पुन्हा एकदा या औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपन्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे.
माजीमंत्री, खासदार शरद पवार यांच्या पुढाकारातून येथे ही वसाहत बसवण्यात आली. औद्योगिकरणाच्या नावाखाली पर्यावरणाला तिलांजली दिली जात असताना दौंडपासून दिल्लीपर्यंतची संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा गप्प आहे. आता, पवार “साहेबांनी’च यामध्ये लक्ष घालून कुरकुंभकरांची या केमिकल संकटातून सुटका करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
1989 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी दौंड तालुक्यातील कुरंकुभ येथे औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. काही रक्कम शेतकऱ्यांच्या हातावर टेकविण्यात आली. परिसरात रासायनिक प्रकल्प सुरू होऊन 30 वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, औद्योगिक वसाहत नेहमीच प्रदूषण, आग, स्फोट यासाठी महाराष्ट्रात चर्चेत राहिली आहे.
औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण 264 कंपन्यांपैकी सरासरी 70 कंपन्या केमिकलशी संबंधित आहेत.
यातील केमिकल कंपन्यांची उत्पादित टक्केवारी ही 60 ते 70 टक्क्यांवर आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांमध्ये दुर्घटना होतात. यामध्ये रॅक्टर फुटणे, बॉयलरचा स्फोट, साठवून ठेवलेल्या केमिकलला अचानक आग लागणे आदी घटना नित्याच्याच झाल्या आहेत.
औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी या प्रकरणी संबंधित कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, दुर्घटनेनंतर अधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा दिला जात आहे. परंतु, अपघात घडण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा कंपन्यांना नियमांचे पालन करावयास लावून त्यांना ताळ्यावर आणण्याची धमक अद्याप कोणीही दाखविली नाही. तीन वर्षांपूर्वी एका कंपनीत दुर्घटना घडल्यानंतर दिल्लीतून सत्ताधारी पक्षातील एका वजनदार नेत्याचा दूरध्वनी आला. त्यानंतर ही फाईल आजतागायत उघडली नाही. लोकप्रतिनिधींकडूनही याबाबत आवाज उठविण्यात आलेला नाही.
कंपन्यांचे अंतर्गत बाह्य सुरक्षेकडे दुर्लक्ष
देशात कायम चर्चेत असलेली कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल कंपन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. त्यामुळे या ठिकाणी बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. सौंदर्य प्रसाधने, औषध निर्मितीसह अनेक कंपन्या आहेत. यातील काही कंपन्या नियम पायदळी तुडवून उत्पादन घेत असल्याचे चित्र आहे.
त्यामुळे याठिकाणी स्फोट, आग आदी दुर्घटना गावकऱ्यांच्या पाचवीलाच पुजल्या आहेत. त्यामुळे येथील कामगार मृत्यूच्या दारात काम करीत आहेत. मात्र, कंपनी व्यवस्थापनाला त्याची फिकीर नाही,त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांच्या तलवारी म्यान होत आहेत. असे प्रकार अनेकदा घडले आहेत.