पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- नद्यांच्या प्रवाहीपणातच सामाजिक जीवनाची समृद्धी सामावली आहे, असे मत पर्यावरण अभ्यासक परिणिता दांडेकर यांनी शनिवारी व्यक्त केले. ज्या भागात नदी प्रवाही नसते. तेथील लोक तापट होतात आणि युद्धही करतात. त्यामुळे प्रत्येक भागात नदीचे प्रवाही असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहयोगाने आयोजित सरिता संमेलनात परिणिता दांडेकर यांचे बीजभाषण झाले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अरूणा ढेरे आणि सचिव वर्षा गजेंद्रगडकर या वेळी उपस्थित होत्या.
इंद्रायणीच्या आनंदडोहात बसून तुकारामांनी गाथा लिहिली. आज याच नदीच्या आनंदडोहमध्ये मैलापाणी जात आहे. सिंधू नदीतील खारफुटीची जंगले जगात लोकप्रिय होती. ती नदीही आता संपत आहे. बंगालमध्ये नदीवर सत्तरहून अधिक कादंबऱ्या आहेत. इच्छामती हे विभूतीभूषण यांचे पुस्तक महत्त्वाचे आहे. भूपेन हजारिका यांनी ब्रह्मपुत्रा नदीला समन्वय करणारी असे म्हटले आहे.
कावेरी नदीमध्ये त्यागराज यांचे संगीत जन्माला आले. त्यामुळे समाजासाठी नदीचे प्रवाही असणे महत्त्वाचे आहे. प्रवाही आहे तोपर्यंत नदी जिवंत आहे. झाडांना, दगडांना, पक्ष्यांना] मानवांना प्रवाही नद्यांची गरज आहे. मराठीमध्ये कृष्णात खोत, नामदेव कोळी, कवी भारत दौंडकर हे नदीबद्दल तळमळीने लिहित आहेत, असे दांडेकर म्हणाल्या.
नदीचा आजवर सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अंगाने अभ्यास झाला आहे. पण, नद्यांचा सामाजिक अंगाने अभ्यास होणे गरजेचे आहे. परदेशातील लेखकांच्या तुलनेत आपल्याकडील लेखकांनी विविध प्रकारच्या लेखनातून नद्यांवर कमी प्रमाणात प्रकाश टाकला आहे. – भारत सासणे, माजी अध्यक्ष, अ.भा. मराठी साहित्य संमेलन