पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृतीपत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही काढल्या, तरी विद्यार्थ्यांना गुण देण्यात येणार आहे. य़ाबाबतचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
भाषा विषयाच्या कृतीपत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या कशाने काढायच्या, याबाबत गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता. राज्य मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या परीक्षा सध्या घेतल्या जात आहेत. दहावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार आहेत. भाषा विषयासाठी बोर्डाकडून कृतीपत्रिकेवरील प्रश्न विचारले जातात.
या प्रश्नांसाठी काही वेळा आकृत्या काढाव्या लागतात. या आकृत्या पेनने काढाव्यात की पेन्सिलने यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता. आता त्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आला.
पेन व पेन्सिलने काढलेल्या आकृत्यांना गुण देण्याबाबत सर्व मुख्य नियमांना सूचना दिल्या जाणार आहेत. हा निर्णय केवळ भाषा विषयाच्या प्रश्नांसंदर्भात आहे. विज्ञान, गणित, भूगोल अशा विषयांसाठी विद्यार्थ्यांना पेन्सिलनेच आकृत्या काढाव्या लागणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.