नवी दिल्ली: देशात मास्कचे उत्पादन गरजेपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे काही दिवस मास्क उत्पादन थांबवण्यात आले आहे. अधिकचे उत्पादन निर्यात करण्याची मागणी मास्क उत्पादन करणाऱ्या उद्योगांनी केली आहे.
सध्या सरकारने एन-95 मास्कवर निर्यातबंदी घातलेली आहे ही बंदी उठवण्यात यावी, अशी मागणी आहे. बंदी उठवल्यास उत्पादकांना आपले अधिकचे उत्पादन विकता येणार आणि थांबवण्यात आलेले उत्पादनही पुन्हा सुरू करता येईल.
कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मार्च महिन्यात सर्वप्रकारच्या मास्क निर्यातीवर बंदी घातलेली आहे. त्याचे कारण होते की, देशात मास्कची कमतरता भासू नये. मात्र, आता मास्कचे उत्पादन जास्त झाले आहे.
मागील महिन्यात वैद्यकीय किंवा सर्जरीसाठी लागणारे मास्क आणि एन-95 मास्क सोडून इतर मास्क निर्यात करण्याची परवानगी दिली होती. यात सुती, रेशमी, लोकर आणि हाताने तयार केलेल्या मास्कचा समावेश होता. मात्र, सर्जरी आणि एन-95 सारख्या मास्कवर अजूनही निर्यातबंदी असल्याने याचे उत्पादन अधिक झाल्याने उत्पादन प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.