कराड -शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय केल्याची माहिती धक्कादायक होती. मात्र, पवार साहेब जो काही निर्णय घेतील तो योग्यच असेल. आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी असू, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिली आहे.
खासदार पाटील म्हणाले, “”केवळ निवडणूक न लढवण्याचा किंवा पक्षीय पदावर न राहण्याचा त्यांचा मानस दिसतोय. परंतु, संस्थात्मक व रचनात्मक कामे तसेच ते युवा पिढीला मार्गदर्शन करतच राहणार आहेत. आम्ही दोघांनी 1958 पासून युवक कॉंग्रेसमधून सुरूवात केली. त्यांनी सलग 65 वर्षे केलेली समाजसेवा, त्यातील 55 वर्ष लोकप्रतिनिधित्व केल्यानंतर आता पुढच्या पिढीसाठी काही तरी करण्याची साहेबांची इच्छा दिसतेय. त्यामुळे ते सांगतील ते धोरण आणि जे बांधतील ते तोरण हीच आमच्यासारखा कार्यकर्त्याची भूमिका राहिल. तसेच फक्त ते पदावर राहणार नाहीत, असे दिसून येत आहे.
पवार यांचे नेतृत्व केवळ पद आणि निवडणुकांपुरते मर्यादित नसून ते व्यापक व्यक्तिमत्व आहे. पुढच्या पिढीला काहीतरी भरीव देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, जबाबदारी असलेल्या संस्थांना अधिक प्रभावी करण्यासाठी ते जास्त वेळ देणार आहेत, असे वाटते. याचा अर्थ ते पूर्णपणे निवृत होत आहेत, असे नाही.” कुठतरी राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याचा त्यांचा निर्णय दिसतोय. त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे मार्गदर्शन घेत राहू. महाभारतात श्रीकृष्णाने मी शस्त्र हातात घेणार नाही, असा पण केला होता.
मात्र, जागेवर बसून मार्गदर्शन केले, तरी सुध्दा युध्दात चमत्कार घडवून आणला होता. पवारसाहेब आमचे असेच उत्तुंग नेते आहेत. नुसते जागेवर बसून व मार्गदर्शन करूनही कलाटणी घडवण्याची ताकद त्यांच्यामधे आहे. मात्र, त्यांनी अचानकपणे घेतलेल्या निर्णयासंदर्भात त्यांच्याशी भेटून चर्चा केल्यानंतरच अधिक सांगता येईल, असेही त्यांनी सांगितले.