नवी दिल्ली – करोनाच्या लॉकडाऊनचा देशातील अर्थकारणावर जो विपरीत परिणाम झाला आहे त्या विषयी संशोधन करणाऱ्या स्टेट बॅंकेच्या एका अहवालात म्हटले आहे की या अर्थकारणाच्या विपरीत परिस्थितीचा सर्वाधिक फटका देशातील आठ समृद्ध राज्यांना बसणार आहे.त्यांचे दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात घसरणार आहे अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
या निष्कर्षानुसार मार्च 21 च्या आर्थिक वर्षात सर्वात मोठा फटका दिल्ली शहराला बसणार असून त्यांचे दरडोई उत्पन्न 15.4 टक्क्यांनी घटणार आहे. चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाचे उत्पन्न 13. 9 टक्क्यांनी घटणार असून गुजरातचे उत्पन्न 11.6 टक्क्यांनी घटणार आहे.
अन्य पाच राज्यांची स्थिती पुढील प्रमाणे असेल. तामिळनाडू 11.4 टक्के, तेलंगणा 11.1, पश्चिम बंगाल 11.1, अंदमान निकोबार 10.6, आणि महाराष्ट्र 10.3. संपुर्ण देशाचा विचार केल्यास देशाचे दरडोई उत्पन्न 5.4 टक्क्यांनी घसरेल असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षातील जीडीपी 3.8 टक्क्यांनी घसरेल असेही यात नमूद करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या मोठ्या कालावधीत मोठ्या शहरांतील सर्वच बाजारपेठा, व्यावसायिक संस्था आणि व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचा हा एकत्रित परिणाम आहे असे सांगण्यात येते.
फारशा समृद्ध नसलेल्या उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि ओडिशा अशा राज्यांना त्या तुलनेत कमी फटका बसलेला असेल कारण त्यांच्या दरडोई उत्पन्नातील घट 8 टक्क्यांपेक्षा कमी असेल. या राज्यांमध्ये व्यापार उदीम फारसा नसल्याने त्यांचे नुकसानही त्या प्रमाणात होणार नाही.
या बॅंकेच्या अर्थतज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की यामुळे निर्माण झालेल्या मंदीच्या वातावरणातून लवकर बाहेर यायचे असेल तर सरकारने आता परंपरागत मार्ग सोडून अधिक आक्रमक धोरण स्वीकारून उपाययोजना केल्या पाहिजेत.