मुंबई : जगाला हतबल करणाऱ्या करोनावर ‘कोरोनिल’ हे औषध काढल्याचा दावा योगगुरू रामदेव बाबा यांनी केला होता. मात्र आता राज्य सरकारने पतंजलीला मोठा झटका दिला आहे. राजस्थान सरकारपाठोपाठ पतंजलीच्या कोरोनिल वर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.
The National Institute of Medical Sciences, Jaipur will find out whether clinical trials of @PypAyurved‘s ‘Coronil’ were done at all. An abundant warning to @yogrishiramdev that Maharashtra won’t allow sale of spurious medicines. #MaharashtraGovtCares#NoPlayingWithLives
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 24, 2020
जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सने क्लिनिकल ट्रायल घेतली का याची माहिती घेण्यात येईल असे सांगतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नकली औषधांना महाराष्ट्रात विकण्यास परवानगी मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. करोनावर औषध शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत असताना बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे औषध शोधल्याचा दावा केला होता. पंतजली योगपीठाने कोरोनिल हे औषध तयार केले असून मंगळवारी ते लाँच करण्यात आले. मात्र, बाजारात आणण्याआधीच केंद्र सरकारने या औषधाच्या विक्रीला विरोध केला होता. बाबा रामदेव यांच्या पतंजलीने आयुर्वेद विभागाकडून केवळ ताप, खोकला व रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या औषधाचीच परवानगी घेतली होती, अशी धक्कादायक माहिती त्यानंतर समोर आली होती.
हे औषध सगळ्यांसमोर आल्यानंतर काही तासांतच केंद्रीय आयुष मंत्रालयाने त्याच्या जाहिराती बंद करण्याचे आदेश जारी केले होते. या औषधाची चाचणी होईपर्यंत जाहिरात थांबवण्यात यावी, असे सांगत केंद्र सरकारने पतंजलीला करोनावरील औषधाची जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते. सध्या केंद्र सरकार या औषधाची चाचणी करत असतानाच पतंजलीला आणखी एक धक्का बसला होता.
पतंजलीने दिलेल्या अर्जानुसार त्यांना लायसन्स देण्यात आले. पण, त्यांनी लायसन्सच्या अर्जात कुठेही करोना व्हायरसचा उल्लेख केलेला नव्हता. विभागाने केवळ रोग प्रतिकारक शक्ती, खोकला व ताप यावर औषध बनवण्याचीच परवानगी दिली होती. करोनावर औषध तयार करण्याची परवानगी कशी मिळाली, याबद्दल पतंजलीला नोटीस पाठवून उत्तर मागणार आहे, असे परवाना अधिकाऱ्यांने सांगितले होते. त्यानंतर आता महाराष्ट्रातही या औषधाच्या विक्रीला परवानगी मिळणार नसल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.