लंडन -इंग्लंडमधील अन्य शहरांतील मैदाने व ओव्हलचे मैदान यांत खूप फरक आहे. येथील खेळपट्टी पाहिली की भारतीय खेळपट्ट्याच समोर येतात. त्यामुळेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारताच्या फिरकी गोलंदाजीचेच आव्हान आमच्या फलंदाजांसमोर राहणार आहे, अशी भीती ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टिव्ह स्मिथ याने व्यक्त केली आहे.
ओव्हलची खेळपट्टी आजवर फसवीच राहिली आहे. त्यावर पहिल्या दिवशी जरी गवत असले तरीही वेगवान गोलंदाजांना विशेष लाभ मिळत नाही हा इतिहास आहे. दुपारच्या सत्रानंतर खेळपट्टी ठणठणीत होत जाते व त्यावर जशी फलंदाजी सोपी वाटते त्यापेक्षा जास्त फिरकी गोलंदाज धोकादायक ठरतात. ही खेळपट्टी फलंदाजीसाठी तशी अनुकूल मानली जाते; परंतु तिसऱ्या दिवसांपासून फिरकी गोलंदाज वर्चस्व राखतात.
भारताकडे रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा ही फिरकी जोडी आहे. हेच आज जगातील सर्वात धोकादायक फिरकी गोलंदाज आहेत. त्यांच्यासमोर बचावात्मक खेळायला गेले तर विकेट जाण्याचीच जास्त संधी असते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आक्रमक फलंदाजी हेच उत्तर योग्य ठरते. मात्र, सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते व इथेच भारतीय संघ वरचढ ठरतो, असेही स्मिथ म्हणाला.
या मैदानाचे आऊटफिल्ड वेगवान आहे. प्रत्यक्ष सामन्यापूर्वी मोविंग केले जाते. सध्याचे येथील वातावरण पाहता सामन्याच्या प्रत्येक दिवशी सकाळी वेगवान गोलंदाजांना थोडा स्विंग मिळेल. मात्र, संध्याकाळी महंमद शमीचे रिव्हर्स स्विंग जास्त चकित करतील. महंमद सिराजला जास्त अनुभव नसला तरीही त्याने ज्या पद्धतीने आजपर्यंत नवा चेंडू हाताळला आहे ते पाहता त्याला कमी लेखून चालणार नाही. त्याच्या
सर्वोत्तम आऊट स्विंगर आहे, असेही स्मिथने म्हटले आहे.
नाणेफेक महत्त्वाची ठरेल
या सामन्यासाठी नाणेफेक सर्वात महत्त्वाची ठरेल. नाणेफेक जिंकणारा संघ पहिल्यांदा फलंदाजीच करण्याचे ठरवेल. कारण, पहिले सत्र पार पडल्यावर फलंदाजी सोपी होणार आहे. त्यामुळे पहिल्या डावातच मोठी धावसंख्या उभारून समोरच्या संघावर दडपण राखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न राहील, असेही स्मिथने सांगितले.