नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचाच विजय होइल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
गेल्या नऊ वर्षांत सरकारने चांगले काम केले असल्याचे नमूद करतानाच ते म्हणाले की भूक आणि गरिबी ही आपली देशातील मोठी समस्या आहे. जर आपल्याला गरिबी दूर करायची असेल आणि देशाला पुढे न्यायचे असेल तर रोजगार निर्माण करावे लागतील.
एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले, गरीब आणि भूक मिटवण्यासाठी रोजगार, रोजगार निर्माण करण्यासाठी उद्योग, व्यापार यांची गरज आहे. जर या तीन बाबी आपण साध्य केल्या तर पाणी, उर्जा, वाहतूक आणि दूरसंचार या चार गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. जोपर्यंत या चार गोष्टी होत नाहीत तोपर्यंत आपल्याकडे गुंतवणूक येणार नाही आणि उद्योगही येणार नाहीत. तसे जर झाले तर रोजगार निर्माण होणार नाहीत आणि त्यामुळे गरिबीही संपणार नाही.
लोकसभा निवडणुकीबाबत बोलताना ते म्हणाले की आम्ही चांगले काम केले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आमचाच विजय होईल. लोक विकासासाठी आम्हाला निवडून देतील. दरम्यान, कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध व्हावे असे धोरण आणण्याचा आपला विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.