नवी दिल्ली -आयपीएल स्पर्धेत एक विजेतेपद मिळवताना कठीण जाते, महेंद्रसिंह धोनीने पाचवे विजेतेपद आपल्या संघाला मिळवून दिले. मुंबई इंडियन्सच्या पाच विजेतेपदांचीही त्याच्या चेन्नई सुपर किंग्जने बरोबरी केली. हे कौतुकास्पद आहे.
चेन्नईला मिळालेला हा केवळ विलक्षण खेळाडूच नसून अलौकिक कर्णघार आहे, अशा शब्दांत गौतम गंभीरने धोनीचे कौतुक केले आहे. धोनीला टोमणे मारण्याची संधी न सोडणारा गंभीर कौतुकाच्या मोडमध्ये कसा गेला यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.
मी पाहिलेल्या अनेक कर्णधारांमध्ये धोनी सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. त्याने जे सातत्य दाखवले ते इतरांना एक मोसमही दाखवता येत नाही; परंतु या माणसाने संघाचे नेतृत्व हाती घेतल्यापासून हे सिद्ध केले आहे. हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही. इथे असेही काही संघ आहेत की ज्यांच्याकडे सर्वात दिग्गज फलंदाज व धोकादायक गोलंदाज होते,
तरीही 2008 सालापासून त्यांना एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. धोनीच्या नेतृत्वात यंदाही चेन्नईच्या संघाची सुरुवात समाधानकारक झाली नव्हती. मात्र, धोनीचे हेच विशेष आहे की तो हार मानत नाही.
त्यामुळेच संघबांधणी नव्याने केली व प्रत्येक सामन्याचा स्वतंत्र विचार केला आणि यशस्वी ठरला. हे जे नियोजन आहे ते तोच करू जाणे हे इतरांचे कामच नव्हे, असेही गंभीरने म्हटले आहे.