नवी दिल्ली – इंडियन प्रिमिअर लीगला येत्या 29 मार्चला मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सुरुवात होणार आहे. याच मैदानावर 24 मे रोजी अंतिम लढतही रंगणार आहे. आयपीएल 57 दिवस चालणार असून आता नव्या रचनेनुसार प्रत्येक दिवशी एकच सामना खेळविण्यात येईल. स्पर्धेतील प्रत्येक सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
पूर्वीच्या वेळापत्रकानुसार स्पर्धेत एका दिवशी दोन सामने खेळविले जात होते. अद्याप याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल समितीने काहीही जाहीर केलेले नसले तरी 29 मार्चला स्पर्धा सुरू होणार असून 24 मे रोजी अंतिम सामना होणार आहे.
वाहिन्यांची नाराजी
स्पर्धेसाठी 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधी मिळेल. सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीने सामने लवकर सुरू करावेत अशी मागणी केली आहे. सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहेत तसेच गेल्या वर्षी काही सामने मध्यरात्री संपले त्यामुळे सामने किमान अर्धा तास आधी सुरू करावेत असे वाहिनीचे म्हणणे आहे. टीआरपीचा मुद्दा येत असून नुकसान होऊ नये यासाठी वाहिनीचे प्रयत्न आहेत.