नवी दिल्ली – भारतातील गरिबाची संख्या पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. शहरात आणि ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले आहे, असा दावा नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी व्ही आर सुब्रह्मण्यम (NITI Aayog Chief Executive Officer BVR Subrahmanyam) यांनी केला आहे.
भारतातील आर्थिक परिस्थिती गेल्या दहा वर्षात कमालीच्या वेगाने सकारात्मक झाली आहे, असे सुब्रमण्यम यांचे म्हणणे आहे. नॅशनल सॅम्पल सर्वे कार्यालयाद्वारे केलेल्या ग्राहकांच्या खर्चाच्या सर्वेक्षणाच्या आधारावर त्यांनी हा निष्कर्ष काढला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्वेक्षण गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणातील माहितीनुसार 2011-12 च्या तुलनेत 2022-23 मध्ये भारतातील दरडोई उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. या आकडेवारीनुसार भारतातील गरिबी आता 5% पेक्षा कमी आहे, असे सुब्रमण्य म्हणाल्याचे काही वृत्त माध्यमांनी जाहीर केले आहे.
सर्वेक्षणातील माहितीनुसार ग्रामीण भागातील दरडोई मासिक उत्पन्न 3,773 रुपये तर शहरी भागातील दरडोई मासिक उत्पन्न 6,459 रुपये आहे. आकडेवारीवरून त्यांनी सांगितले की, सध्या केवळ पाच टक्क्यापर्यंतच लोक गरिबीत जीवन जगत आहे. दहा वर्षाच्या काळात ग्रामीण आणि शहरातील लोकांनी आपला खर्च अडीच पटीने वाढविला आहे.
यावरून दोन्ही भागातील गरिबी कमी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अन्नधान्य खाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर प्रोटीन खाण्याचे प्रमाण वाढले असे त्यांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांमध्ये सर्वसमावेशक विकास होईल याची काळजी घेतली आहे.
यामुळे शहरातील लोकाबरोबरच ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढत आहे. त्याचबरोबर शहरातील सर्व वर्गाचे उत्पन्न समान पातळीवर वाढण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. शेतकर्यांना सरकारने मोठ्या प्रमाणात मदत केल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. त्याचबरोबर त्यांचा खर्चही वाढत आहे. अशा प्रकारची योजना शहरात सुरू करण्याची गरज असल्याचे मत अनेकदा व्यक्त करण्यात आले आहे. मात्र यावर आतापर्यंत केंद्र सरकारने भाष्य करण्याचे टाळले आहे.