प्रसाद शेटे
मेढा – विधानसभा निवडणुकीची हवा तापू लागली असतानाच अचानक सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमुळे राजकीय पक्षांची रस्सीखेच होताणार आहे. लढाईसाठी शस्त्रे पाजळली गेली, पत्ते टाकण्यासही सुरुवात झाली; पण जावळी तालुक्यात प्रत्येक फासा उलटा पडू लागला आहे. दोन्ही राजांच्या भाजप प्रवेशानंतरही त्यांचे काही समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेल्या पदांवर कायम आहेत. पश्चिम महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर दीपक पवार यांनी कमळाची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे आगामी राजकारणात भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील कटुता तर वाढणारच आहे, शिवाय संघर्षही वाढणार आहे.
महाराष्ट्रात आज कोण कोणासोबत आहे, कोण कोणत्या पक्षात आहे, याचा पत्ता सामान्य मतदारांना लागत नाही. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातल्या सीमा निव्वळ पुसट झालेल्या नाही तर त्या पूर्णपणे पुसूनही टाकल्या जात आहेत. मतदारांनी कोणाला कशासाठी कौल दिला होता, याचा सोयीस्कर विसर नेत्यांना पडल्याने साराच खेळखंडोबा आहे. जावळीतील राष्ट्रवादीचे नेते, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असलेले राजे समर्थक राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेल्या पदांना चिकटून आहे तरीदेखील भाजपला खुले आम पाठिंबा देताना दिसत आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत असताना राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असणाऱ्या जावळीत मात्र “तेरी भी चूप मेरी भी चूप’ अशी स्थिती आहे. जावळीतील नेत्यांनी अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जावळीतील नेत्यांनी आपापल्या भूमिका स्पष्ट केल्यानंतर निवडणुकीतील खरी चुरस पहायला मिळणार आहे.
“आय ऍम विथ पवारसाहेब’चा ट्रेंड
दोन्ही राजांना फोडण्यात भाजपला यश आले आले असले तरी तळागाळातील युवा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यात भाजप अयशस्वी ठरला आहे. तालुक्यातील बहुतांश युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसला मानणारा आहे. सोशल मीडियावर “आय ऍम विथ पवारसाहेब’ हा ट्रेंड असून त्याला युवकांमधून प्रतिसाद दिसत आहे. जनादेश यात्रा आणि शरद पवारांच्या सभेला उपस्थित असलेल्या युवकांच्या संख्येत खूप तफावत दिसत होती. त्यामुळे राष्ट्रवादीचा गड राखण्यासाठी हे युवा कार्यकर्ते कितपत झुंज देणार, त्याची उत्सुकता आहे.