राजेंद्र वाघमारे
नेवासा – जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, शाळेची घंटाही वाजलेली आहे. त्यामुळे शिक्षकांना आता वर्गात विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करण्यासाठी उभे राहावे लागत असताना मात्र गुरुजींच्या डोक्यात सध्या फळ्यावरचे गणित सोडून निवडणुकीचेच गणित डोक्यात फिट बसत असल्यामुळे सध्या काही गुरुजी निवडणूक प्रक्रियेत चांगलेच गुरफटल्याचे दिसून येऊ लागले आहे.
जिल्हा प्राथमिक बँकेत सत्ताधारी आणि विरोधी गटाला मानणार्या काही शिक्षकांकडून या निवडणुकीत पुन्हा सत्तांतर घडवून आणण्यासाठी दोन्ही बाजूच्या इच्छुक उमेदवारांची काही गुरुजी मंडळी शाळा सोडून निवडणुकीची ‘टिमकी’ वाजविताना दिसून येत आहे.
त्यामुळे शाळेच्या गणिताकडे गुरुजींचे दुर्लक्ष होऊन आता जिल्हा बँक निवडणुकीत ‘परिवर्तनाचे गणित’ चांगलेच फिट झाल्यामुळे काही शिक्षक आपल्या पॅनेलचा नेताच कसा पॉवरफुल्ल आहे, विरोधी नेते कसे बाजूला गेले या बँकेत कोणी कसा घोटाळा घातला? कोणी काय केले याची दिवसभर चर्चा शाळा सोडून निवडणुकीकडेच गुरुजींचे लक्ष वेधले जात आहे.
या निवडणुकीत नेमके काय होईल ‘जय की पराजय’, या चर्चाच सध्या शाळा सोडून सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे गुरुजी सध्या ज्ञानार्जन करतात की राजकारण असा सवालही सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे. निवडणुकीमध्ये गुरुजींचे शाळेकडे दुर्लक्ष होऊन जिल्हा बँकेच्या राजकीय आखाड्यात कोण बाजी मारणार? कोण काय करणार? या चर्चाच गुरुजींच्या श्रीमुखातून झडताना दिसून येत आहे. विद्यार्थ्यांकडे काही शिक्षकांचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा धरू लागली आहे.