आळंदी -संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा उद्या शनिवार (दि. 13) रोजी सुरू होत आहे. यंदाच्या पालखी प्रस्थान सोहळ्यात मोजक्याच म्हणजे अवघ्या 50 व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे आदेश जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांनी दिले असल्याने महत्त्वाच्या 50 व्यक्तींव्यतिरिक्त कोणासही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
उद्या दुपारी चार वाजता सुरू होणारा पालखी प्रस्थान सोहळा हा प्रथा-परंपरेप्रमाणे होणार आहे. यावेळी श्रींना अभिषेक, पवमान अभिषेक, आरती, शेजारती असे विविध धार्मिक कार्यक्रम मंदिरातच होणार आहेत. पालखी (यंदा फक्त चल पादुका) ही प्रस्थान सोहळ्यानंतर मंदिरालगत असणाऱ्या अजोळ घरी दशमीपर्यंत ठेवण्यात येणार असल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
याठिकाणी नियमित नित्याचे धार्मिक कार्यक्रम, पूजा पाठ, आरती व रात्रीचा जागर नियमितपणे होणार असून, दशमीला पालखी सरकारच्या आदेशानुसार वाहनातून किंवा हेलिकॉप्टरमधून पंढरीकडे प्रस्थान ठेवले, असेही देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले. यंदा वारीवर करोनाचे सावट आहे. देशातच 144 कलम लागू असल्याने त्याचे पडसाद वारीच्या उत्सवावरही दिसून येत आहे. जी अलंकापुरी या काळात भाविकांनी गजबजलेली असते, तिथे आज सर्वत्र शुकशुकाट आहे.
आळंदी शहरात मंदिर परिसरातील 100 मीटरपर्यंतची सर्व दुकाने उद्या बंद राहणार आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये कुऱ्हाडे आळीत एका करोना रुग्णांचे निधन झाल्याने उपविभागीय अधिकारी खेड संजय तेली यांनी दिलेल्या आदेशानुसार हा संपूर्ण परिसर बफर झोन घोषित करण्यात आला आहे. या परिसरात कोणतीहू दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही. सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे.
-समीर भूमकर,
मुख्याधिकारी, आळंदी
बाहेरील नागरिकांना जागा उपलब्ध करून देऊ नये
आळंदी शहरातील सर्व धर्मशाळा, मठ, लॉज यांना आषाढी वारीच्या प्रस्थान सोहळ्याच्या अनुषंगाने कोणत्याही भाविक, बाहेरील नागरिकांना राहण्यासाठी रूम, जागा उपलब्ध करून देण्यात येऊ नये, अन्यथा संबंधितांवर अपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 भारतीय साथरोग 1897 अंतर्गत कारवाई करण्यात येईल. सर्व धर्मशाळा आणि नागरिकांनी याची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.
पोलिसांचा खडा बंदोबस्त
प्रस्थान सोहळ्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे सुमारे सव्वाशे पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पाच अधिकारी, असा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी सांगितले.